शेतीच्या कामांमुळे राज्य शासनाचा निर्णय
नाशिक : प्रतिनिधी
उन्हाची लाट व पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या मशागतीची कामे लक्षात घेता, राज्य शासनाने अंत्योदय व प्रधान्य गटातील लाभार्थ्यांना एप्रिलसह पुढील दोन महिन्यांचे स्वस्त धान्य एकत्रित वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
स्वस्त धान्याचे लाभार्थी सर्वाधिक ग्रामीण भागामध्ये आहेत. एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्र लाट आली आहे. मे महिन्यातदेखील उन्हाची लाट अशीच कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे धान्य घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहणे जिकिरीचे ठरणार आहे. याशिवाय पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या मशागतीची कामे असतात. त्यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
नाशिक जिल्हा पुरवठा शाखेकडून एप्रिल व मे महिन्याच्या धान्याची उचल घेण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य वाटपाला सुरुवात झाली असून, लवकरच मे व जूनचे वाटप सुरू केले जाणार आहे.
एप्रिल, मे व जून महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त अंत्योदय व प्रधान्य गटातील लोकांना एकत्रित तीन महिन्यांचे धान्य देण्याचा प्रयत्न राहणार आहे. ई-पॉस यंत्रावरदेखील तीन महिन्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. – रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी
जिल्ह्यात 14 लाख शिधापत्रिकाधारक
जिल्ह्यात एकूण 14 लाख 66 हजार 188 असून, यात अंत्योदयचे सुमारे 1 लाख 77 हजार 275 लाभार्थी आहेत. तर प्राधान्य कुटुंबातील 7 लाख 33 हजार 34, गैर प्राधान्य कुटुंब 5 लाख 7 हजार तसेच दारिद्य्ररेषेवरील 47 हजार शिधापत्रिकाधारक आहेत.
Three times more food grains will be available in April