महाराष्ट्रातही निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. महानगरपालिका केव्हाही जाहीर होणार आहेत. त्यानंतर विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणूका पुढील काही काळात होणार आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. कुणी पुनर्बांधणीला लागले आहे, तर कुणी नेतृत्व बदल करतो आहे, तर कुणाकडे करण्यासारखे काहीच नाही, तर काहींना शेजारील निवडणुकीतून नवसंजीवनी मिळाल्याचे जाणवते. वर नमूद केलेल्या ज्या घटना राज्यात घडत आहे, त्या येणाऱ्या निवडणुकीशी संबंधित तर नाही ना, अशी शंका मनाला सहजच शिवते.
समाजात धार्मिक, जातीय तेढ निर्माण करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा उद्देश तर नाहीए ना, असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? नसेल तर विचार करा, की अशा घटना यापूर्वी महाराष्ट्रात कधी घडल्या होत्या का? औरंगजेब आणि टिपू सुल्तानाचा उदो उदो या महाराष्ट्रात करण्याची हिंमत कुणी करू शकतो का?
मराठा आणि हिंदूबहुल राज्यात जुलमी शासकांच्या समर्थकांवर कडक कारवाई का नाही होत? इतकं सगळं होऊन ही प्रमुख मंत्री गण यावर गप्प का? स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी समजणारे पक्ष सत्तेत असतांनाही अल्पसंख्यांक म्हणवणारा समाज असे धाडस कसे करू शकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली तर खरे काय ते शहाण्याला लगेचच कळेल.
खराखुरा हिंदुत्ववादी पक्ष किव्हा अशा पक्षाच्या नेत्यांनी विधायक हिंदुत्ववाद जोपासावा. राष्ट्रद्रोह्यांना तिळमात्र थारा न देता, त्याचे समूळ उच्चाटन करावे. समाज विघातक तत्व शोधून शोधून ठेचावे. माता भगिनींवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्यांचे डोळे फोडावे. देहविक्री करणाऱ्यांची चामडी सोलावी. कायदा आणि न्यायव्यवस्थेची जरब असावी. पोलीस, निमलष्करी आणि लष्करी दलांचा वापर करून देशद्रोह्यांना देश सोडून पळून जावे, असे पछाडावे. असा राष्ट्रवाद (हिंदुत्ववाद) चालेल. देशहिताचा विचार करणाऱ्यांना हा देश आणि हे राज्य सुरक्षित वाटले पाहिजे. ज्यांना इथे राहणे असुरक्षित वाटत असेल, त्यांचा राष्ट्रवाद शंकास्पद समजावा.
मतांसाठी आणि राजकीय फायद्यासाठी हिंदूंची सहानुभूती मिळवण्यासाठी गैरहिंदूंना अकारण त्रास देऊ नये. त्यांच्या राष्ट्रवादाबद्दल अकारण शंका घेऊ नये, असे वाटल्यास सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे. उत्तरेतील प्रदेशात असे बघायला मिळते आहे. त्यांची कार्यशैली थोडी निराळी असली तरी ती लोकांना भावते आहे. जोवर राष्ट्र हिताला धरून असलेले हिंदुत्ववाद राबवतात, तोपर्यंत जनता साथ देईल. परंतु, राष्ट्रहिताच्या नावाखाली हिंदुत्ववाद राबवाल, तर कालांतराने जनता साथ सोडेल, कारण यात राष्ट्रहित नसेल. दिर्घकाळात देशासाठी ते हानिकारक असेल.
राष्ट्रवाद आणि हिंदुत्ववाद या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दहा वर्षांपूर्वी दिसलेला राष्ट्रवाद हळू हळू लोप पावत चाललेला वाटतोय, आणि आता हळू हळू हिंदुत्ववाद डोकं वर काढतोय. सत्ताधाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. जेव्हा सबका साथ, सबका विकासाचा नारा दिला, तेव्हा जनतेने विकासाच्या सादेला साथ दिली आहे, हिंदुत्ववादाला नाही. विकास झाला तर सर्वांचाच विकास होणार आहे, हाताला काम मिळेल, कामातून दोन पैसे मिळतील. जीवनमान वधारेल, जीवन अधिक सुखकारक होईल. विकासच पोट भरेल, धर्म नाही.
सत्तेतील धुरंधरांना ही बाब माहीत होती म्हणून आधी विकासाचा नारा दिला असावा. हिंदुत्ववाद हा जर त्यांचा छुपा अजेंडा असेल तर त्यांची अधोगती सुरू होणार, हे नक्की. असे काही ते करणार नाही, अशी आशा करायला हरकत नाही. सर्वसामान्यांसाठी धर्म हा केवळ घरापूरता मर्यादित असतो, फारतर आसपासच्या लोकांपर्यंत. राज्य आणि देश पातळीवर धर्म काही देणार नाही, धर्माच्या मागे अंधपणे पळाल्याने काही हाती लागणार नाही.
आपल्या देवाचे मंदिर झाल्याने फारतर समाधान वाटेल, अभिमान वाटेल. परंतु त्याने आपल्या जीवनात काहीही फरक पडणार नाही, हे आपल्याला माहीत असते. फक्त भावना आणि श्रद्धा असल्याने त्यात आपण नकळतपणे अडकून जातो, आणि त्याबद्दलच्या बातम्या बघण्यात, चर्चा करण्यात किव्हा तिथे जाण्यात आपला बहुमोल वेळ खर्च करतो. त्यापेक्षा स्वतःवर आणि आपल्या कुटुंबियांवर लक्ष केंद्रित करून जीवनात जे अपेक्षित आहे, ते केल्याने आपल्या जीवनात फरक पडेल. तुम्ही प्रगती करा, छान आयुष्य जगा, हीच तर त्या देवाची इच्छा आहे, नाही का ?