नाशिक

माहेरघर योजनेच्या लाभाला महिला होईनात तयार!

जिल्ह्यात 55 केंद्रांत सुविधा; केवळ चार गर्भवतींनी घेतला लाभ

नाशिक ः देवयानी सोनार
सध्या पावसाळ्याचे दिवस असून, अनेकदा प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रस्त्यांच्या, वाहनाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे महिलांना प्रसूतीसाठी अडचणीचे ठरते. प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात दाखल होण्याची महिलांची उदासीनता दिसते. मजुरी बुडेल यासाठी प्रसूतीसाठी तीन ते पंधरा दिवस अगोदर दाखल होण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे.
गरोदर महिलांना बाळंतपणाच्या आधी विश्रांती, वैद्यकीय तपासणी, आहार आणि सुरक्षित प्रसूतीसाठी आवश्यक सुविधा एकाच छताखाली देण्यात येतात. आतापर्यंत या केंद्रात एप्रिल व मे या दोन महिन्यांत एप्रिलमध्ये एकूण 351 आणि मे महिन्यात 118 महिलांची प्रसूती झाली. पेठमधील जोगमोडी आणि त्र्यंबकेश्वर येथील चिंचओहोळ या केंद्रात माहेरघर योजनेंतर्गत केवळ चार महिलांनी लाभ घेतला आहे. गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील 55 आदिवासी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत माहेरघर योजना सुरू करण्यात आली असली, तरी पेठ आणि त्र्यंबकेश्वर भागातील केवळ चार महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील आदिवासी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालयांत माहेरघर योजना राबवली जाते. अनेकदा प्रसूती जोखमीची किंवा गुंतागुंतीची होण्याची शक्यता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती तारखेच्या तीन ते पंधरा दिवस अगोदर दाखल करण्यास सांगितले जाते; परंतु आदिवासी भागातील महिला शेतात किंवा मोलमजुरीच्या कामांना जात असतात. दिवस भरले तरी शेतीकाम सुरू ठेवतात. सुटी घेणे त्यांना परवडणारे नसते. त्यामुळे त्या प्रसूतीसाठी तीन किंवा पंधरा दिवस दाखल होण्यास राजी नसतात. मात्र, या महिलांना माहेरघर योजनेंंतर्गत देखभाल, स्वच्छता आणि आहार व्यवस्थेसाठी दररोज प्रतिलाभार्थी 300 रुपये व वेगळे 200 रुपये देखभाल खर्चासाठी दिले
जातात.
या योजनेंतर्गत गर्भवती, तिचे लहान मूल (असल्यास) आणि एक नातेवाईक यांच्यासाठी राहण्याची व जेवणाची मोफत सोय उपलब्ध आहे. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून गरजूंना वैद्यकीय सुविधा वेळेत मिळवून दिल्या जातात. राज्य शासनाने ही योजना प्रभावीपणे राबवून दुर्गम भागातील मातांचे जीव वाचवण्याचे व सुरक्षित मातृत्वासाठी पाऊल उचलले आहे.

प्रत्येक माहेरघरची व्यवस्थापन जबाबदारी स्थानिक महिला बचतगट किंवा स्वयंसेवकांवर सोपवली जाते. विशेषत: गर्भारपणात होणारे आजार अ‍ॅनिमिया, रक्तस्राव इतिहास असलेल्या जोखमीच्या महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील माहेरघरात तीन ते पाच दिवस आधी दाखल करून वैद्यकीय निगा राखली जाते.

माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने माहेरघर योजना सन 2011-12 पासून सुरू केली. 2022-23 या आर्थिक वर्षात राज्यातील नऊ जिल्ह्यांतील 78 केंद्रांत माहेरघर योजना कार्यरत आहे.नाशिकमध्ये यापूर्वी दोन माहेरघर केंद्रांना मान्यता होती. आता ती 55 आरोग्य केंद्रांत सुरू झाली आहे. जिल्ह्यात कळवण येथे माहेरघर केंद्र 9, पेठ 7, सुरगाणा 8, नाशिक 2 (धोंडेगाव, जातेगाव), त्र्यंबकेश्वर 7, दिंडोरी 10, इगतपुरी 5, देवळा 3, अशा एकूण 55 प्राथमिक आरोग्य केंद्रांत माहेरघर केंद्र आहे.

यापूर्वी केवळ दोन केंद्रांत माहेरघर योजना कार्यान्वित होती. आदिवासी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालयांत माहेरघर योजना गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. अति जोखमीच्या, गुंतागुंत टाळण्यासाठी ज्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला आहे अशा प्रसूतीसाठी येणार्‍या महिलांनी पंधरा दिवस किंवा वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल व्हावे.
डॉ. हर्षल नेहते, माता बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

 

Editorial Team

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

17 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

17 hours ago