मराठा भगवे वादळ मुंबईकडे

जरांगेंंना आझाद मैदानावर एक दिवसाची परवानगी

मुंबई : ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले भगवे वादळ आज धडकणार आहे. उद्यापासून मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोेलन करणार आहेत. काल सकाळी जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून निघाले. मुंबईच्या दिशेने जात असलेल्या मराठा आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, या आंदोलकांमुळे सुमारे 47 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली.

न्यायालयाने मनोज जरांगें यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेण्यास सांगितले होते. त्यानुसार काल जरांगें यांना मुंबई पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, एकच दिवस त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली असून, अटी-शर्तीही घातल्या आहेत. जरांगे यांनी एक दिवसाचे नाही तर आरक्षण मिळेपर्यंत आंदालन करण्याची भूमिका घेतली आहे.
आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करता येणार नाही. तसेच या आंदोलनाला सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी असेल असं मुंबई पोलिसांनी त्यांच्या आदेशात म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांनी या आधी आझाद मैदानावरील आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना काही अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार मनोज जरांगे यांना फक्त एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत फक्त पाच हजार आंदोलकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अटी-शर्तींचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची सशर्त परवानगी दिली आहे. 29 तारखेला केवळ एकच दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर मात्र मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. आंदोलनकर्त्यांची वाहनांना फ्री-वेने केवळ वडीबंदर जंक्शनपर्यंत येण्याची मुभा देण्यात आली आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत असलेल्या पाच वाहनांना आझाद मैदानापर्यंत येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

एका दिवसात मागण्या मान्य करा, जरांगेंची मागणी

एका दिवसात जर सरकार आमच्या मागण्या मान्य करत असेल तर त्यांच्या अटी आम्हाला मान्य आहेत. आम्हाला जर एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली तर सरकारने एका दिवसात आरक्षण द्यावं. पण जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही उठणार नाही. असे जरांगे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *