अपघातात चिमुरडीसह दोन ठार

येवल्यात वाहतूक कोंडीमुळे अपघातांमध्ये वाढ

येवला : प्रतिनिधी
शहरातील येवला-मनमाड राज्य महामार्गावर धानोरे शिवारातील मोठा मारुती मंदिरासमोर सकाळच्या सुमारास पादचारी तरुणाला वाहनाने धडक दिली. त्यात गणेश हिरे (वय 31) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर येवला शहरातील फत्तेबुरुज नाका भागात हॉटेल ओम गुरुदेवसमोर दुसरा अपघात झाला. टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार देवीदास शेळके (वय 55) गंभीर जखमी झाले, तर त्यांची नात जयश्री शेळके (वय 6) हिचा जागीच मृत्यू झाला. जखमी देवीदास शेळके यांच्यावर येवला शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दोन्हीही अपघातप्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात चालकांविरोधात गुन्हा दाखल
झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून येवला शहरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. अनेक वाहने येवला शहरातील महामार्गावरून ये-जा करीत आहेत. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. शहरातील येवला-मनमाड महामार्गावर एस.एस. मोबाइल शॉपीसमोर ट्रकच्या धडकेत विजय आहेर यांचा मृत्यू झाला. वाहतूक कोंडीमुळे अपघाताच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने वाहतुकीची कोंडी थांबवावी, अशी मागणी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *