‘स्थायी’त पाण्यासह रस्तेप्रश्नावरून प्रशासन धारेवर

सभापतींचा अधिकारी-ठेकेदारांना कारवाईचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
पाण्याचा शटडाऊन घेऊनही शहरातला पाणीपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. नियोजन न केल्याने नागरिकांना पाणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. याबरोबरच शहरात सर्वत्र रस्ते खोदून ठेवले असून, खबरदारीच्या उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. स्थायी सभापती मच्छिंद्र सानप यांनी पाणीपुरवठा व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी साइटवर जाऊन पाहणी करावी. याकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकार्‍यांसह ठेकेदारांवर कारवाईचा इशाराही सानप यांनी यावेळी दिला.
स्थायी समितीची सभा गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी स्थायी सदस्यांनी विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून प्रशासनाला घेरले. रंजना बोराडे यांनी प्रभागात चौथ्या दिवशीदेखील पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे म्हटले. भारती ताजनपुरे यांनीदेखील प्रभागात यापूर्वी पाण्याची समस्या होतीच. मात्र, गेल्या चार -पाच दिवसांपासून प्रभागातील नागरिक पाण्यासाठी आपल्या घरी येऊन ठाण मांडत आहेत. पाण्याची समस्या गंभीर असताना, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी फक्त ऐकून घेतात. मात्र, त्यावर कृती करत नसल्याचे चित्र आहे. मुकेश शहाणे यांनी पाणीपुरवठ्याचे काही अधिकारी फोन उचलत नसून, मनमर्जीप्रमाणे वागत असल्याने त्यांची बदली करण्यात यावी. शहरात सर्वच भागांत रस्ते खोदून ठेवले आहेत. परंतु, रस्ते खोदले आहेत, त्याची वाहनधारकांना माहिती मिळावी व कुठलाही अपघात होणार नाही यासंदर्भात ठेकेदार व अधिकार्‍यांनी खबरदारी घेतली नसून, त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. आठ दिवसांत ही परिस्थिती सुधारली नाही तर प्रत्येक अधिकार्‍याच्या दालनात जाऊन आंदोलन करू, असा इशारा शहाणे यांनी दिला. नागरिकांची तहान भागविण्यासाठी तीस ते पस्तीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी स्थायी समितीत दिली. मात्र, त्यावर सभापतींचे समाधान न होऊ शकल्याने अधिक प्रमाणात टँकरचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. नगरसेवक राहुल दिवे, आदिती पांडे, माधुरी बोलकर, किरण गामणे दराडे, भारती ताजनपुरे, जयश्री गायकवाड, दीपाली कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला. अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देऊन नियमांची पूर्तता करून घेण्याचे निर्देश देत अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे तसेच ठेकेदारांवर पाइपलाइन फुटल्यास वा नुकसान झाल्यास पाचपट दंड करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

प्रत्येक प्रभागात दोन टँकर
पाणीप्रश्नावरून नगरसेवकांच्या भावना पाहता सभापती मच्छिंद्र सानप यांनी प्रत्येक प्रभागात पाण्याचे दोन टँकर सुरू करण्याच्या सूचना केल्या. याआधी एका विभागासाठी दोन टँकर दिले जात होते. परंतु, शहरातील पाणी परिस्थिती बिकट झाल्याने, आता प्रत्येक प्रभागात पाणी टँकर वाढवण्याचे निर्देश सभापतींनी पाणीपुरवठा विभागाला दिले.

 

Administration on edge over road issues including water in ‘permanent’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *