जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा मोर्चा

शेतकर्‍यांचे आंदोलन पाच दिवस स्थगित

दिशाभूल झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील रिंगरोड प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी सोमवारी (दि. 18) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला केवळ पाच प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावण्याचा आग्रह धरणार्‍या प्रशासनाने अखेर संयमाची व सकारात्मकतेची भूमिका घेत प्रत्येक गावातील प्रतिनिधींना बैठकीसाठी परवानगी दिली. त्यानंतर जवळपास पन्नास शेतकरी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अडीच तास सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील रिंगरोडबाधित प्रत्येक गावातील शेतकर्‍यांनी आपली भूमिका मांडत भूसंपादन प्रक्रियेमुळे होणार्‍या अन्यायाबाबत सविस्तर माहिती दिली व न्यायाची मागणी केली. शेतकर्‍यांचे म्हणणे शांतपणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पुढील पाच दिवसांत प्रत्येक गावातील दोन प्रतिनिधींनी प्रशासनासोबत चर्चा करावी. विविध विभागीय भूसंपादन प्रक्रियेतील अधिकार्‍यांशी समन्वय साधून मध्यम सुवर्ण मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली. तोपर्यंत शासनाच्या मालकीच्या जागा वगळता इतर कोणत्याही गावातील खासगी जागेवर रिंगरोडचे काम सुरू केले जाणार नाही. कोणतीही मोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार नाही, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
मुंगसरे व मातोरी परिसरात झालेल्या मोजणीबाबत शेतकर्‍यांनी अधिकृत हरकती दाखल कराव्यात. त्यावर कायदेशीर मार्ग काढत सदर मोजणी रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिले.
हा मार्ग निश्चित झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक गावनिहाय रिंगरोडच्या प्रस्तावित मार्गाची पाहणी करून शेतकर्‍यांच्या संमतीने अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.
प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे पुढील पाच दिवसांसाठी जाहीर करण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय शेतकरी व शेतकरी प्रतिनिधींनी एकमताने घेतला. मात्र, हे आंदोलन पूर्णपणे मागे घेतलेले नसून शासनाकडून कुठल्याही प्रकारची दिशाभूल झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी ऐंशीवर्षीय आजीवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात आला. कमलाबाई किरकाडे यांच्या घरी जाऊन प्रतिनिधींनी प्राथमिक भेट घेतली. भविष्यात जर शेतकर्‍यांना न्याय मिळाला नाही, तर उपोषण, नाशिक ते जामनेर शेतकर्‍यांचा निषेध पायी मोर्चा, तसेच अधिक आक्रमक स्वरूपाची आंदोलने उभी करण्याबाबत पुढील रणनीती आखण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पुढील पाच दिवसांत गावोगावी जाऊन जनजागृती मोहीम राबवून शेतकर्‍यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचेही ठरविण्यात
आले.
या बैठकीसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, कॉम्रेड राजू देसले, शेतकरी नेते साहेबराव दातीर, नवनाथ शिंदे, अ‍ॅड. कैलास खांडबहाले, विनोद नाठे यांच्यासह मुंगसरे, मातोरी, जलालपूर, गोवर्धन, चांदशी, मखमलाबाद, महादेवपूर, आडगाव, विंचूर गवळी, माडसांगवी, विहितगाव, वडनेर, पिंपळगाव खांब, पाथर्डी, गौळाणे, आंबेबहुला, सारूळ, राजूर बहुला आदी विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते.

Only 31.59 percent of the reservoir is in the dam complex.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *