बांधावरली न्याहारी…

शेताच्या बांधावर बसून खाल्लेल्या चार घास न्याहारीची चव काही औरच लागते ना! आपल्या बळीराजाला तर घरातल्यापेक्षा त्याच्या शेतात बांधावर बसून न्याहारी करायला खूप आवडतं. घरातून निघताना तो चार-दोन घास अगदी घाईत खातो. आणि शेतात गेल्यावर मात्र मोकळ्या आभाळाखाली, शेतातल्या काळ्या मातीवर मांडी घालून बसून अन् तिच्या सान्निध्यात तिनेच आपल्याला दिलेली भाकर खात जणू तिचे आभार मानत बहरलेल्या त्या हिरव्यागार शेताकडे न्याहाळत असतो. आणि त्या आभाळाचेही आभार मानत असतो. यात कृतार्थ भावही दिसून येतो. कारण ते आभाळ वेळोवेळी बरसत असते वेळेवर म्हणूनच दोन वेळचे आपल्याला पोटभर मिळतं याची त्याला जाणीव असते. तेव्हा नक्कीच मात्र चार घास त्याच्या उदरात जास्तच जातात अन् तृप्तीचा ढेकरही येतो.
त्यातला म्हणजे त्याच्या न्याहारीतला काही वाटा हा त्याच्या लाडक्या मोती कुत्र्याचा तर हमखास असतोच. पण काही त्या पाखरांचाही असतो. तो जेवायला बसला की झाडावरची चिवचिव, कावकावही वाढते. एवढंच काय तर तो जेवायला बसला की अगदी त्या इवल्या मुंग्यासुद्धा जवळ येतात हो! त्याच्या न्याहारीतला त्यांचाही वाटा घ्यायला. जणू सारेजण त्याची वाटच पाहत असतात. आणि म्हणूनच की काय त्याला घरात न्याहारी मात्र काही गोड लागत नाही आणि मग तो शेतावरती जाताना ती सोबत बांधून नेतो आणि तिकडे गेल्यावर मात्र आनंदाने त्या सार्‍यांसोबत पोटभर खातो. कधी घाईघाईत निघाला किंवा विसरला तर त्याची सहचारिणी पाठीमागून डोक्यावर पाटीमध्ये न्याहारीची भाकरी बांधून घेऊन जातेच.
हा सारा अनुभव मलाही लहानपणी मामाच्या घरी गेल्यावर यायचा. शेताच्या अगदी जवळच म्हणजे अगदीच हाकेच्या अंतरावर घर असूनही मामा आरोळी देऊन भाकरी मात्र शेतातच मागवायचा. बैलजोडी सावलीला बांधून आणि बांधावर बसून जेवायचा. शिवारानं दिलेलं शिवाराच्याच हव्याहव्याशा अशा सान्निध्यात मोकळ्या आभाळाखाली बसून खायचं. त्याची न्याहारी होईपर्यंत बैलांचाही चारा खाऊन व्हायचा. खरंच खूप छान अनुभव असतो.
खरंच बळीराजाचे ऋणानुबंध खूप घट्ट असतात. ती काळी माती, ते हिरवं शिवार, ते आभाळ अन् निसर्गाशी निगडित त्या हरेक घटकाशी. भलेही मग त्यात नसतील गोडधोड पक्वान्नं, भलेही एकच भाजीभाकर असेल पण सोबत जर झणझणीत चटणी, कांदा आणि ताकाचा काठोकाठ भरलेला तांब्या असला की मग बस्स! त्याला मात्र तुमचं बाकी दुसरं काहीही नको असतं. खरंच महागड्या, आलिशान हॉटेलातल्या त्या सजवलेल्या टेबल-खुर्चीवर बसून आणि पंचपक्वान्नाने भरून खाल्लेल्या ताटालाही मागे टाकते ही बांधावर मांडी घालून बसून खाल्लेली न्याहारी आणि हे सारं मात्र ती स्वतः खाऊन अनुभवल्याशिवाय काही कुणाला कळणारच नाही…

वंदना गांगुर्डे

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago