आमचा निवडणुकीशी संबंध नाही; गिते बंधूंचा खुलासा
नाशिक : प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकीत मतदान सुरू असतानाच समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या एका कथित बनावट मतपत्रिकेमुळे महायुतीच्या गोटात मोठी खळबळ उडाली. या मतपत्रिकेत पसंती क्रमांक एक – गोकुळ गिते असा संदेश प्रसारित करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गणेश गिते यांच्याशी चर्चा केल्यानंतर गिते बंधूंनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याविरोधात गोकुळ गिते यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. गोकुळ गिते यांची उमेदवारी महायुतीसाठी डोकेदुखी ठरत असल्याने त्यांची माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागली होती. महायुतीतील तीन मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करून समजूत काढल्यानंतर त्यांनी प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने गोकुळ गिते यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहिले.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेत अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचे जाहीर केल्याने निवडणुकीतील राजकीय वातावरण आधीच तापले होते. अशातच मतदानाच्या दिवशी समाजमाध्यमांवर गोकुळ गिते यांना प्रथम पसंती देण्याचे आवाहन करणारी मतपत्रिका व्हायरल झाली. त्यामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि या प्रकरणाची तातडीने दखल घेण्यात आली.
पत्रकारांशी बोलताना गणेश गिते यांनी या संपूर्ण प्रकाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. महायुतीचा धर्म पाळत आम्ही निवडणुकीतून बाजूला झालो. प्रचार थांबविल्यानंतर आम्ही कोणत्याही मतदाराशी किंवा कार्यकर्त्याशी संपर्क साधलेला नाही. समाजमाध्यमांवर फिरणारी मतपत्रिका ही कोणीतरी हेतुपुरस्सर प्रसारित केली असून, आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. गिते म्हणाले की, प्रचार थांबवल्यानंतर आम्ही पूर्णपणे निष्क्रिय होतो. या निवडणुकीशी आमचा कोणताही संबंध नाही. महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी गोकुळ गिते यांनीही समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या मतपत्रिकेबाबत अनभिज्ञता व्यक्त केली. मतदार आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असूनही आम्ही प्रचार थांबवला. मतदानाच्या दिवशी प्रसारित झालेल्या पोस्टशी आमचा कोणताही संबंध नाही. कोण कोणाला मतदान करेल, हे आम्ही सांगू शकत नाही. लोकांच्या मनात काय आहे हे कोणालाही सांगता येणार नाही, असे
ते म्हणाले.
Fake ballot paper causes a stir within the Mahayuti alliance.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…