नांदूरमध्यमेश्वर धरणाचे नूतनीकरण, निफाडला शिवार रस्त्यांचा प्रश्न सुटला
निफाड : तालुका प्रतिनिधी
पावसाळ्यात गोदावरी, दारणा आणि कादवा नद्यांना येणार्या पुरामुळे गोदाकाठची पिके पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होत होते, तसेच जीवितहानी आणि वित्तहानी ही दरवर्षी ठरलेलीच. त्यामुळे आमदार दिलीप बनकर यांनी हा प्रश्न अजितदादा पवार यांच्यासमोर मांडला अन् अजितदादांनी क्षणाचाही विलंब न करता यासाठी निधी मंजूर करीत धरणाचे नूतनीकरण आणि दहा गेट बसवीत हा प्रश्न मार्गी लावला. आता अजितदादांच्या अकाली जाण्याने गोदाकाठ परिसर दादांच्या आठवणींना उजाळा देत आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार म्हणजे एकच वादा अन् अजितदादा हे समीकरण महाराष्ट्रभर दृढ झाले आहे. निफाड तालुक्याचा विचार करावयाचा झाल्यास तालुक्यातील रस्ते सुस्थितीत करण्याचे श्रेय अजितदादा पवार यांच्याकडे जाते. वावी ठुशी येथे सर्वाधिक मोठे वीज वितरणचे सबस्टेशन करण्याबरोबरच छोट्या -मोठ्या नद्यांवर वळण बंधारे, प्रमुख महामार्ग याबरोबरच नांदूरमध्यमेश्वर धरणासाठी त्या काळी तब्बल 58 कोटी रुपये मंजूर करीत धरणाला दहा दरवाजे बसविण्याबरोबरच धरणाचे नूतनीकरण करून दरवर्षी गोदाकाठला पूरपाण्याच्या संकटातून नागरिकांची सुटका केली. धरणात साठलेला गाळ वाहून गेला पाहिजे जेणेकरून धरणातील पाणी साठवण क्षमता वाढेल, यासाठी धरणाला पुन्हा जास्त दरवाजे बसविले पाहिजे.
राज्यातील सहकार टिकला पाहिजे. साखर कारखानदारी सुरू राहिली पाहिजे. जेणेकरून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच त्या त्या परिसराच्या विकासाला गती मिळेल, हे तत्त्व हेरून दादांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून कारखान्यांची थकहमी घेतली. त्यामुळे काहीकाळ साखर कारखानदारी चालू शकली. यासाठी दादांनी आटोकाट प्रयत्न केले. नाशिक जिल्हा हा दादांचा बालेकिल्ला. मागील विधानसभा निवडणुकीत 15 पैकी तब्बल 7 आमदार निवडून आणत त्यांनी आपले महत्त्व अधोरेखित केले. जिल्ह्यावर मजबूत पकड असावी, यासाठी दादांनी जिल्ह्यातील तब्बल तीन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले. तालुक्याचे आमदार दिलीप बनकर हे दादांचे कट्टर समर्थक, तर बनकरांचा कार्यकर्ता वर्गदेखील मोठा आहे. तालुक्यात निवडणूक कुठलीही असो, अजितदादांच्या सभेशिवाय निवडणुकीला रंगत येत नसे. दादांनी तालुक्यात अनेक भरीव कामे केली आहेत. गुरुवारी तालुक्यातील गावांमध्ये बंद पाळण्यात आला होता. गावागावांत श्रद्धांजलीचे फलकही त्यांच्या कामाची पावती देत आहेत.
नांदूरमध्यमेश्वर धरणाला गेट नव्हते तेव्हा सायखेडा, चांदोरी, शिंगवे, चापडगाव, चाटोरी, नांदूरमध्यमेश्वर, कोठुरे, काथरगाव, कुरुडगाव, शिवरे, पिंपळस या गावांची शेती पुराच्या पाण्याखाली जात होती. तर गावांना पाण्याचा वेढा पडत असत. अनेक वेळा हेलिकॉप्टरने पुरात अडकलेली माणसे काढावी लागली. मात्र, आता धरणाला गेट झाले अन् पुराची हानी टळली आहे. याचे सारे श्रेय आमदार दिलीप बनकर आणि धरणाची वेळोवेळी पाहणी करणार्या अजितदादांना जाते.
– नंदकुमार सांगळे, माजी संचालक, पिंपळगाव बाजार समिती