सुटीच्या दिवशी गर्दीचा विक्रम; लाखो भाविकांनी घेतले मातेचे दर्शन
सप्तशृंगगड : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवाला दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहतात. रामनवमीपासून सुरू होणार्या या उत्सवात धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती नोंदवली जात असून, प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
रविवारच्या सुटीचा लाभ घेत लाखो भाविकांनी काल श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगगडावर अभूतपूर्व गर्दी केली. चैत्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच भाविकांची मोठी रांग लागली होती. वाढत्या गर्दीमुळे प्रशासन व ट्रस्टच्या वतीने विशेष नियोजन करत एकेरी मार्ग व्यवस्था, बॅरिकेड्स आणि नियंत्रण कक्षाद्वारे सूचनांचे प्रसारण करण्यात आले.
सकाळी 10 वाजेपर्यंत भाविकांची रांग पहिल्या पायरीपासून चांदणी चौकापर्यंत पोहोचली होती. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असल्यामुळे पोलिस प्रशासन, ट्रस्ट कर्मचारी व सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती. नियंत्रण कक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे भाविकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत होत्या. गर्दीचे व्यवस्थापन सुरळीत पार पडण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली होती. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अॅड. ललित निकम, तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, नानाजी भामरे, प्रशांत निकम, मंदिर विभागप्रमुख विश्वनाथ बर्डे, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख यांच्यासह नारद आहिरे, मुरलीधर गायकवाड, मुरलीधर गावित, श्याम पवार, विजय भवरे, तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेनके ग्रामसेवक संजय देवरे, सदस्य राजेश गवळी, पोलिसपाटील शशिकांत बेनके, ट्रस्ट प्रशासन, पोलिस, ग्रामपंचायत, पुरोहित वर्ग, महसूल, आपत्ती व्यवस्थापन पथक, अधिकारी व कर्मचारी आदी प्रयत्नशील आहेत. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. भाविकांनी देवीच्या दर्शनानंतर समाधान व्यक्त करत “चैत्रोत्सवाच्या काळात मिळणारे दर्शन हे आयुष्यातील विशेष क्षण आहे,” अशी भावना व्यक्त केली. अनेक भाविकांनी कडक उन्हाची पर्वा न करता पायी गड चढत श्रद्धा व्यक्त केली.
चैत्रोत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण
चैत्रोत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्रावर काकडा आरती, पंचामृत महापूजा, रुद्राभिषेक, महानैवेद्य आरती व सांज आरती असे विविध धार्मिक विधी भक्तिभावात पार पडत आहेत. रविवारी सकाळी सात वाजता पार पडलेल्या पंचामृत महापूजेत ट्रस्टच्या विश्वस्त सौ. मनज्योत पाटील यांनी सहकुटुंब सहभाग घेतला. त्यानंतर देवीला पैठणी परिधान करून सुवर्ण दागिन्यांनी साजशृंगार करण्यात आला व महाआरतीने वातावरण भक्तिमय झाले.
Flood of devotees at Saptashringgad