तरुण

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

– अमोल जगताप

नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून एका तरुणीची निर्घृण हत्या झाली आणि त्यानंतर संबंधित तरुणाने आत्महत्या केली. दोन तरुण जीव काही क्षणांत संपले, दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. या घटनेकडे केवळ गुन्हा म्हणून न पाहता, बदलत्या सामाजिक वास्तवाचे एक गंभीर प्रतिबिंब म्हणून पाहण्याची गरज आहे.
खरंतर प्रेम… हा शब्द उच्चारला की मनात अनेक भावना दाटून येतात. कोणाच्या चेहर्‍यावर हसू उमटते, तर कोणाच्या डोळ्यांत आठवणी दाटतात. पण अलीकडे प्रेमाच्या नावाखाली घडणार्‍या काही घटना मन सुन्न करून टाकतात. अशा घटना आपल्याला एकच प्रश्न विचारायला भाग पाडतात, तो म्हणजे – प्रेमाची व्याख्या आपण खरोखर समजून घेतली आहे का?
आजची तरुण पिढी शिक्षण, नोकरी आणि करिअरच्या निमित्ताने घरापासून दूर राहते. सहवास वाढतो, मैत्री होते आणि कधी कधी आकर्षणही निर्माण होते. पण सोबत राहिलो, एकत्र काम केले किंवा मन जुळले म्हणजे ते प्रेमच असते, असा समज धोकादायक ठरू शकतो. प्रत्येक जवळीक ही आयुष्यभराच्या नात्याची हमी नसते.
आजचे जग वेगाने बदलत आहे. त्यात सोशल मीडिया, चित्रपट आणि आजच्या वेब सिरीज प्रेमाचे आकर्षक चित्र रंगवतात. पण दोन-तीन तासांच्या चित्रपटात दाखवले जाणारे प्रेम आणि प्रत्यक्ष आयुष्य यात खूप मोठा फरक असतो. आयुष्य हा काही चित्रपट नाही की चूक झाली तर पुढच्या दृश्यात सर्व काही सुरळीत होईल. इथे प्रत्येक निर्णयाचे परिणाम आयुष्यभर सोबत राहतात.
प्रेम ही सुंदर भावना आहे; पण एखाद्याने नाते पुढे नेण्यास नकार दिला, वेगळा मार्ग निवडला किंवा आयुष्यात नवीन निर्णय घेतला, तर त्याचा स्वीकार करण्याइतकी भावनिक परिपक्वता प्रत्येकाने विकसित करायला हवी. नकार स्वीकारता न आल्यावर निर्माण होणारा राग कधीच प्रेमाचे रूप असू शकत नाही.
आज अनेक तरुण प्रेमात इतके गुंतून जातात की स्वतःची ओळखच विसरून बसतात. करिअर, कुटुंब, स्वप्ने आणि स्वतःचे भविष्य यापेक्षा एकच व्यक्ती महत्त्वाची वाटू लागते. पण सत्य हे आहे की प्रेम हा आयुष्याचा एक भाग आहे; संपूर्ण आयुष्य नाही. लक्षात असू दया की आयुष्य हे अनेक नात्यांनी, अनेक स्वप्नांनी आणि अनेक जबाबदार्‍यांनी बनलेले असते. त्या प्रत्येक नात्यात मतभेद होणे स्वाभाविक आहे; पण त्याचे उत्तर हिंसा कधीच असू शकत नाही. रागाच्या एका क्षणात घेतलेला निर्णय अनेक आयुष्ये उद्ध्वस्त करू शकतो. म्हणूनच भावनांवर नियंत्रण ठेवणे, गरज पडल्यास कुटुंबीय, मित्र किंवा समुपदेशकांची मदत घेणे हे कमजोरीचे नव्हे तर शहाणपणाचे लक्षण आहे. पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. मुलांना केवळ शिक्षण आणि करिअरच नव्हे, तर नात्यांमधील जबाबदारी, अपयशाचा स्वीकार आणि भावनिक संतुलन यांचाही वारसा देणे तितकेच आवश्यक आहे. कारण संस्कार हेच आयुष्याच्या कठीण वळणांवर योग्य निर्णय घेण्याचे बळ देऊ शकतात.
आजच्या तरुण-तरुणींनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी.. प्रेम करा, पण विचारपूर्वक करा. नाते जोडा, पण स्वतःला हरवू नका. आयुष्याच्या आणाभाका घेण्यापूर्वी स्वभाव, मूल्ये, जबाबदार्‍या आणि भविष्य यांचाही तितकाच विचार करा. क्षणिक आकर्षणावर आयुष्याचे निर्णय घेऊ नका.
कारण खरे प्रेम माणसाला जगायला शिकवते, संपवायला नाही.
आयुष्य हे काही दोन-तीन तासांचा चित्रपट नाही; ते अनेक दशकांचा प्रवास आहे. त्यामुळे आयुष्याचे निर्णय भावनेच्या भरात नव्हे, तर विवेक, संयम आणि परिपक्वतेच्या आधारावर घ्या. प्रेम सुंदर आहे; पण त्याहूनही सुंदर आहे विवेक. कारण विवेकाने घेतलेले निर्णय आयुष्य घडवतात, तर भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्य उद्ध्वस्त करून जातात…

 

Is love life… or just a part of life?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

1 hour ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

1 hour ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

1 hour ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

2 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

2 hours ago

द्वारका परिसरात खड्ड्यात मालवाहू टेम्पो अडकला

वडाळागाव : प्रतिनिधी नाशिकच्या द्वारका परिसरात गुरुवार (दि. 30) रोजी पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या चिखल व…

2 hours ago