मनरेगातून शोषखड्ड्यांसाठी अनुदान; विविध गावांत अभियानाची अंमलबजावणी
मालेगाव : प्रतिनिधी
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात भूजलपातळी वाढविण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून आणि कृषी विभागाच्या सहकार्याने ‘जलतारा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून भूजल पुनर्भरणास मोठी चालना मिळणार आहे. यामुळे शेतकर्यांना सिंचनासाठी दीर्घकालीन लाभ होणार आहे.
सध्या रासायनिक खते, कीटकनाशके आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे जमिनीतील गांडूळ नष्ट होत असून, जमीन कडक बनत आहे. या समस्येवर उपाय म्हणून जमीन उताराच्या खालच्या बाजूस जलतारा शोषखड्डे तयार करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. साधारणतः पाच फूट लांब, पाच
फूट रुंद आणि सहा फूट खोल खड्डा तयार करून त्यात खाली मोठे दगड, मध्यभागी मध्यम आकाराचे दगड आणि वर खडी भरली जाते. या पद्धतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपून ओलावा टिकून राहतो तसेच जमिनीची सुपीकता वाढण्यास
मदत होते.
या अभियानासाठी लोकसहभागासह सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाकडून प्रत्येकी पाच जेसीबी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. साजवहाळ, बहाळ, वजीरखेडे, वडगाव, लेंडाणे, झोडगे, लखणी आणि सौंदाणे आदी गावांमध्ये जलतारा मॉडेलची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
प्रकल्पाच्या प्रात्यक्षिकावेळी तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी शेतकर्यांना जलतारा मॉडेलची सविस्तर माहिती दिली. पावसाचे सुमारे 35 टक्के वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरल्यामुळे विहिरींची पातळी वाढून वर्षभर पाण्याची उपलब्धता राहण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी व कोरडवाहू भागात हे मॉडेल प्रभावी ठरत असून, वर्षभरात दोन ते तीन पिके घेणे होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
साजवहाळला प्रकल्पाचा प्रारंभ
साजवहाळ येथे ‘जलतारा’ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. ‘हर खेत को पानी’ या संकल्पनेवर आधारित या प्रकल्पांतर्गत मनरेगा योजनेंतर्गत प्रत्येक शोषखड्ड्यासाठी 4 हजार 800 रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. एक एकर क्षेत्रासाठी एक जलतारा पुरेसा ठरत आहे. चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे तीन लाख 60 हजार लिटर पाणी जमिनीत मुरविण्याची क्षमता या मॉडेलमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
‘जलतारा’ अभियान हे भूजलपातळी वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि दूरदृष्टीचा उपक्रम आहे. प्रत्येक एकरात शोषखड्ड्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत मुरवले जाणार असल्याने भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. ‘हर खेत को पानी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारा हा प्रयोग शेतकर्यांसाठी दिलासादायक आहे. अधिकाधिक शेतकर्यांनी लोकसहभागातून या अभियानात सहभागी व्हावे.
– भगवान गोर्डे,
तालुका कृषी अधिकारी
‘Jaltara’ promotes increase in groundwater level