इगतपुरीत हल्ल्यात तरूणाचा जागीच मृत्यू

इगतपुरी : प्रतिनिधी
शहरातील रेल्वे तलाव येथे अंघोळीसाठी गेलेल्या विशाल चंद्रकांत ठवळे, वय 36 वर्ष, राहणार डागबगंला, इगतपुरी या विवाहित तरुणावर रविवार दि. 22 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अज्ञातांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्याने यात विशाल ठवळे याचा अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू झाला. यातील संशयित अज्ञात आरोपी फरार झाले असुन इगतपुरी पोलीस संशयित आरोपींचा कसून शोध घेत आहे.

रविवारी मयत विशाल ठवळे हा आपल्या 13 वर्षाचा भाचा व 8 वर्षाचा मुलगा सोबत घेवुन घरापासुन जवळच असलेल्या रेल्वे तलावात अंघोळीसाठी गेला होता.तलावाच्या पाण्यात अगोदरच दोन अज्ञात तरूणी व दोन तरूण हे अंघोळ करीत होते.याच ठिकाणी बाजुला विशाल ठवळे अंघोळ करून कपडे बदलण्यासाठी आला तेव्हा बाजुच्या कपड्यावर पाणी उडाल्याची कुरापत काढुन संबंधित तरूणी व तरूणांनी वाद निर्माण करीत धारदार शस्त्राचा धाक दाखवुन विशाल यास मुलींची माफी मागण्यास सांगुन पाया पडण्यास व नाक घासण्यास लावले.
त्यानंतर वाद मिटला असे भासवुन झाल्यावर अज्ञात तरूणी व तरूण मद्य पिण्यासाठी तलावाच्या बाजुला बसले.यावेळी त्यातील एका अज्ञात तरूणाने मागुन पळत जात कुठल्यातरी धारदार शस्त्राने विशालच्या मानेची नस कापुन पुन्हा वार करणार तोच विशालने जोराची कींकाळी मारल्याने अज्ञात पसार झाले. मदतीसाठी धावा करणार्‍या विशालचाअति रक्तस्त्रावामुळे जागीच मृत्यु झाला अशी माहिती पोलीसांना विशालचा भाचा व मुलाने जबाबात दिली असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहचले व रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशाल यास ग्रामिण रूग्णालयात आणले.पोलीसांनी घटनेचा पंचनामा करीत श्वानपथक व गुप्त माहितीद्वारे तपास यंत्रणा सुरू असुन फरार गुन्हेगाराला शोधण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान ऊभे ठाकले आहे.या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण
पसरले आहे.
विशेष म्हणजे मुंबई व नाशिक येथून चालत्या रेल्वेमध्ये अनधिकृत व्यवसाय करणारे हॉकर रोजच इगतपरी रेल्वे स्थानकात उतरुन शहरात दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे सर्रास पाहावयास मिळते.या हॉकर बरोबरच मेल एक्सप्रेसमध्ये तृतियपंथी व गाणे म्हणणार्‍या काही महिला व मुली शहरात धुडगुस घालत आहेत.या अनधिकृत हॉकरवर रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाचा अंकुश नसल्याने हा सर्व प्रकार बिनबोभाट सुरु आहे.त्याच प्रमाणे शहरातील अनेक ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद असल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावलेले असुन याबाबत प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *