धार्मिक सलोखा बिघडवल्यास कठोर कारवाई : पोलीस उपायुक्त काळे
सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड, सातपूर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांसह शांतता समितीच्या पदाधिकार्यांची लेखानगर परिसरातील स्प्लेंडर हॉल येथे बैठक पार पडली. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरळीत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून विविध उपाययोजना आणि सूचना देण्यात आल्या. यंदा 2, 3, 4, 5 आणि 6 सप्टेंबर या पाच दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित दिवसांत रात्री दहा वाजेपर्यंतच वाद्यास परवानगी असेल.
कोणताही धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी यावेळी दिला. गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, स्वयंसेवक नेमावेत, नियमांचे काटेकोर पालन करावे आणि अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी यंदाची ‘से नो टू ड्रग्ज’ ही संकल्पना प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले.
पोलिस आयुक्तालय नाशिक शहराच्या वतीने आयोजित या बैठकीत सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, अंबडचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, इंदिरानगरच्या वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, चुंचाळे पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील, सातपूरचे निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. डीजेच्या वापराऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, ध्वनिप्रदूषण मर्यादेचे पालन करावे. विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्याचा विधायक उपयोग करण्याबाबत पोलिसांनी सूचना दिल्या. महापालिका, महावितरण आणि इतर विभागांनाही योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.
इंदिरानगर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे. वालदेवी नदीवर विसर्जनावेळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. लाइटची योग्य व्यवस्था केली जाणार असून, यंदा उत्तम देखाव्यासाठी पारितोषिक ठेवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत यंदा 44 गणेश मंडळांना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा लवकर करण्याचे आवाहन मधुकर कड यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस निरीक्षक धनराज पाटील यांनी केले.
गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक मुद्दे
* दहा दिवसांसाठी स्वयंसेवकांची नेमणूक करावी.
* 2 ते 6 सप्टेंबरदरम्यान रात्री 12 पर्यंत वाद्ये वाजवण्यास परवानगी.
* सायंकाळी सहापासूनच वाद्ये वाजवायला सुरुवात करावी.
* विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे.
* पोलीस ठाण्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा सकारात्मक वापर करावा.
सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत की नाहीत, याची खात्री करावी. उड्डाणपूल दुचाकीसाठी खुला करून वाहतूक कोंडी टाळावी. विसर्जनावेळी पोलिस बंदोबस्त वाढवावा. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात.
– बंडू दळवी, उपमहानगरप्रमुख, शिवसेना (उबाठा गट)
वालदेवी नदीवर विसर्जनावेळी योग्य सुरक्षेची व्यवस्था
करावी. गेल्या वर्षी दोन युवक बुडाल्याची घटना घडली होती. यंदा अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
– दीपक धोंगडे, शिवनेरी फाउंडेशन, पाथर्डीगाव