प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!

संतांची भूमी मानल्या जाणार्‍या महाराष्ट्र राज्याची निर्मिती
1 मे 1960 रोजी झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आपल्या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. ऐतिहासिक गौरव, सांस्कृतिक समृद्धी, नैसर्गिक विविधता आणि आर्थिक प्रगती यांचा अनोखा संगम असल्याने महाराष्ट्र भारताचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी –
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक
महाराष्ट्र देश हा ॥
हे महाराष्ट्रगीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे. डोंगराएवढे उत्तुंग कर्तृत्ववान लोक या राज्यात होऊन गेल्याने हे महान पुरुषांचे राष्ट्र-महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर ही उपराजधानी म्हणून निश्चित करण्यात आली. जवळपास 12 कोटींच्या वर लोकसंख्या असणार्‍या महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीत 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे.
राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरिरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही इतक्या महाराष्ट्रीयन लोकांनी योगदान दिले आहे की, महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली होती.
महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषी-मुनींची जशी भूमी आहे, तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र महान पुरुषांचे राष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळकृष्ण गोखले, टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजगुरू, नाना पाटील यांसारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.
संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला.
हल्ली जवळपास 12 कोटींच्या वर लोकसंख्या असणार्‍या महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीत 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्र राज्याचे कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती असे सहा प्रशासकीय (महसुली) विभाग पडलेले आहेत.
महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करावयास हवा.
जय महाराष्ट्र

My dear Maharashtra is a country!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *