कांद्याच्या भावात घसरण सुरूच

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अश्रू अनावर

लासलगाव  :   समीर पठाण

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात कमालीची घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.१५०० ते २००० हजार रु क्विंटल दराने विकला जाणारा कांदा आज मात्र कमीत कमी ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल विकत आहे.येणाऱ्या काळात कांद्याचे भाव वाढतील या आशेवर काही शेतकऱ्यांनी कांदा काढणी करून तो कांदा चाळीत साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे तर काही शेतकऱ्यांनी कांदा चाळ नसल्याने नवीन कांदा चाळ तयार करण्याचे काम सुरू केले आहे तर काही शेतकऱ्यांची कांदा काढणी उशीरा झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे शेतात पडून आहेत.

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ४०० ते ५०० बाजारभाव इतका कमी दर मिळत आहे. त्यामुळे कांद्यातून नफा तर सोडाच पण वाहतूक खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.कांद्याचे भाव सतत घसरत असल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने यात लक्ष घालण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

यंदा राज्यात सर्वत्र उन्हाळ कांद्याचे पीक अमाप आहे तसेच उत्पादनाच्या तुलनेत मागणी कमी आहे.उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.कांद्याच्या दरात होणारी घसरण यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.कांदा लागवड,साठवणूक व विक्री व्यवस्थापन यामध्ये बळीराजाला अनेक अस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जावे लागते. त्यातच महागडी खते,वाढते इंधनाचे भाव,नियमित विजेचा प्रश्न याचाही फटका बळीराजाला बसला आहे.

 

भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांकडून उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते.मात्र यंदा अतिउष्णतेमुळे कांद्याची प्रत खराब होत आहे. प्रत घसरलेल्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून लिलावासाठी आणल्यास योग्य असे बाजारभाव मिळतील

सुवर्णा जगताप सभापती
लासलगाव बाजार समिती

कांदा उत्पादकांना रोख स्वरूपात मदतीची गरज
कांदा हे नगदी आणि चांगला पैसा मिळवून देणारे पीक असले तरी सध्या मात्र बाजारभाव कमी झाल्याने उत्पादकांची मोठी अडचण झाली आहे.दिवसेंदिवस वाढणारी मजुरी,खते,औषधे,मशागत यांचे गगनाला भिडलेले दर यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च वाढला आहे मात्र त्या तुलनेत कांद्याला बाजारभाव मिळत नाही.सद्य परिस्थितीचा विचार करता सरकारने कांदा उत्पादकांना रोख स्वरूपात मदत करणे तसेच बाजारभाव वाढण्यासाठी निर्यातीचे धोरण बदलण्याची नितांत आवश्यकता आहे

सचिन होळकर कृषीतज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *