मार्कर पुरवणार्‍या कंपनीच्या चौकशीचे आदेश

मुंबई :
महापालिका निवडणुकीत बोटावर मार्करने लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. निवडणुकीसाठी कोरस कंपनीने मार्कर पुरवले आहेत. त्यामुळे या कंपनीची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी दिली. तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत असा प्रकार होऊ नये म्हणून भारत निवडणूक आयोग विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जी मैसूर इंक कंपनीची शाई वापरते ती शाई वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराला मतदानाच्या पूर्वी बोटावर मार्करने शाई लावली जात आहे. मात्र, ही शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात समाज माध्यमात व्हिडीओही व्हायरल झाले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने लावलेली शाई सहज पुसली जात असल्याचे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या प्रकरणाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच निवडणुकीदरम्यान गोंधळ निर्माण करणार्‍यांवर कारवाईचा इशाराही वाघमारे यांनी दिला आहे. सन 2011 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोटावर शाई लावण्यासाठी मार्कर वापरले जात आहेत. शाई लावल्यानंतर ती सुकायला 10 ते 12 सेकंद लागतात. या कालावधीत मतदार मतदान कक्षातच असतो. एकदा शाई सुकली की ती काढता येत नाही. ज्या प्रकारची शाई मार्करमध्ये आहे तीच शाई भारत निवडणूक आयोग वापरतो. जर शाई पुसून दुबार मतदान झाले, तर संबंधित मतदारावर कारवाई केली जाईल, असे वाघमारे यांनी सांगितले. शाई सुकण्याआधी ती पुसली गेली तर ती मतदाराची चूक आहे. अशा मतदारांवर गुन्हाही दाखल होऊ शकतो, असे ते म्हणाले.
शाई पुसली जात असल्याचा विरोधकांचा आरोप
दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वापरण्यात येणारा मार्कर पेन निकृष्ट दर्जाचा असून शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप केला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि युवासेनेचे नेते साईनाथ दुर्गे यांनीही हाच आरोप केला आहे. शाई पुसण्यासाठी सॅनिटायझरचीही गरज नाही. शाई तशीच पुसली जाते, असे परब म्हणाले. तर मी आज सकाळी मतदान केले आणि घरी गेल्यावर डेटॉलने हात धुतला. तेव्हा शाई पूर्णपणे निघून गेली. हा गंभीर मुद्दा असून बनावट मतदानाची शक्यता निर्माण होते, असे दुर्गे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मार्कर वापरला जाणार नाही
मतदान सुरु असतानाच राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, बोटाला मार्करद्वारे लावत असलेली शाई एकदा सुकली की ती निघू शकत नाही. ज्या लोकांनी शाई पुसण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी काय वापरले हे आम्हाला माहिती नाही. समाजात फेक नरेटिव्ह पसरवल्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर पत्रकारांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मार्करचा वापर करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना वाघमारे यांनी, ‘मार्कर पेनचा अनुभव पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही इंडिलेबल इंकचा वापर करणार आहोत.’ अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता 5 फेब्रुवारीला मार्करऐवजी काडीने बोटाला शाई लावली जाणार आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

3 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago