चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी आणि जिद्द काय असते.
काही अनवाणी जे चालतात त्यांचे पाय पोळतात. एक आनंदी नावाची मुलगी होती. तिची जिद्द आणि चिकाटी बघून तर कुणीही निःशब्द होईल. अशी आनंदी कमी शिकलेली, परंतु सर्व गुणसंपन्न होती. तिचे लग्न आईवडिलांनी लहान वयात केले. नवरा गरीब, कामचुकार व व्यसनाधीन निघाला. नंतर त्याचा दवाखाना सुरू झाला. ही आनंदी सकाळपासून मिळेल ते काम करू लागली. पोळ्या लाटणे, घराघरांतली धुणीभांडी करणे. नंतर दवाखान्यातही थोडं काम करणे. त्यातून मिळणार्‍या पैशात ती नवर्‍याचा दवाखाना करणे. प्रपंच चालवून संसार करत होती. नंतर तिला गोंडस दोन मुलंही झाली. तिची दोन्ही मुलेही अभ्यासात लहानपणापासून खूप हुशार होती. जणू काही आईच्या जिद्द चिकाटीची त्यांना जाण होती. आणि मग काय मुलांचा विचार करून ही आनंदी
चार पैशाची बचत बँकेत करू लागली. मुलांच्या शिक्षणासाठी थोडे पैसे वाचवू लागली अन् मुलंही शिक्षणात पुढे गेली. एक मुलगा इंजिनिअरचे शिक्षण घेत होता आणि दुसरा डी.फार्मसी.चे शिक्षण घेत होता. मग काय आनंदीच्या चेहर्‍यावर आनंद झळकू लागला. आनंदी दिसायला सावळी, नाजूक. लहान वयात जबाबदारीचे ओझे पेलणारी समंजस हुशार मुलगी होती. तिचे शिक्षण बघितले तर बारावी झालेले होते, परंतु हुशारी आणि समंजसपणा एखाद्या डिग्रीवाल्यांना लाजवेल असा होता. आनंदीचे दोन्ही मुले शिकण्याचे श्रेय हे फक्त एकट्या आनंदीचे होते. कारण आनंदीने जर हिंमत खचली असती तर काहींचं चांगल घडलं नसतं.
आनंदीला एक दुःख नवर्‍याचं होतं, पण दुसरं सुख हुशार बुद्धिवान मुलांचं होतं. म्हणून आनंदीच्या वागण्यात प्रलोभनातून जिद्द, चिकाटीचा जन्म झाला. ह्यातून सखारात्मक ऊर्जा निर्माण होऊन गरिबीतून बाहेर येण्याचे, जिद्दीने पुढे जाण्याचे आणि दुःखाचे दिवस पालटण्याचे बळ आनंदीला मिळाले. आनंदीने जिद्द, चिकाटीने आणि हिंमत करून संसाराचा भार पेलला आणि एक वेगळी आपली ओळख निर्माण केली. स्वतः परिस्थितीमुळे कमी शिक्षित असूनही मुलांचे उज्ज्वल भविष्य आनंदीने घडविले व संसारवेलही फुलवली व जीवनाचा मार्ग निवडला.
यातून एकच संदेश आपणा सर्वांना मिळतो की, आळस हा माणसाचा शत्रू आहे. प्रत्येकात जिद्द, चिकाटी, हिंमत असेल तर जीवनात प्रत्येक व्यक्तिरेखा ही आपले आयुष्य घडवू शकते. मनुष्याने कधीही आयुष्यात हार मानू नये. माणसाला जीवनात कसे जगायचे काय जीवनात मिळवायचे हे ध्येय असेल तर स्वतःच्या मनगटाच्या बळाच्या जोरावर आपण जिद्दीने ध्येय गाठू शकतो.
शून्यातून जग निर्माण करताना खूप मोठी हिंमत लागते, परंतु स्वकष्टाने व अक्कलहुशारीने अशक्यही शक्य करता येते, हे तेवढेच खरे! खाटल्यावर बसून देव देत नाही. नशीब घडवण्याची हिंमत, जिद्द ही मनगटात आणि मनात असावी लागते. मग एक वेगळे विश्व तुमचं स्वागत करेल बघा!
अशक्यही शक्य करतील स्वामी..!

Perseverance and determination

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *