पावसाचा फटका; भाजीपाला कडाडला

गृहिणींचे बजेट कोलमडले

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील भाजीपाला बाजारात दरवाढीची झळ अधिक तीव्र झाली आहे. पावसामुळे अनेक भागांतील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, शेतात पाणी साचल्याने भाजीपाला काढणीला विलंब झाला आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटल्याने किरकोळ बाजारात बहुतांश भाज्यांचे दर वाढले आहेत. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या कडक उन्हामुळे शेतातील भाजीपाला काढणीला वेग आला असला, तरी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम अद्याप बाजारावर दिसत आहे. बाजारात दर्जेदार भाजीपाला कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने व्यापार्‍यांकडून वाढीव दर आकारले जात आहेत. टोमॅटो, गवार, भेंडी, डांगर, चवळी, हिरवी मिरची, पालेभाज्या तसेच इतर भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
व्यापार्‍यांच्या मते, पुढील काही दिवस हवामान अनुकूल राहिले आणि बाजारातील आवक वाढली तर दरात काही प्रमाणात घट होऊ शकते. मात्र, पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या स्वयंपाकासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. महागाईचा आणखी एक फटका बसत आहे. बाजारातील आवक सुरळीत झाल्यानंतरच भाजीपाल्याच्या दरात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भाजीपाल्याचे दर असे (प्रतिकिलो रुपयांत)
टोमॅटो 40 ते 50 रुपये, बटाटा 40 ते 50, कांदा 40 ते 50, भेंडी 70 ते 90, गवार 90 ते 120, दुधी भोपळा 50 ते 60, डांगर 80 ते 100, चवळी 60 ते 80, वांगी 60 ते 80, ढोबळी मिरची 70 ते 90, हिरवी मिरची 100 ते 120, दोडका 50 ते 70, कारले 70 ते 90, काकडी 40 ते 50. पालक 40 ते 50 रुपये जुडी, मेथी 40 ते 50 जुडी, शेपू 40 ते 50 जुडी, कोथिंबीर 40 ते 60 रुपये जुडी.

Rain takes its toll; vegetable prices skyrocket.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *