परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच धडकले पोलिस
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
शासनाच्या लालफितीत अडकलेल्या विविध प्रलंबित प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत मागण्या मार्गी न लागल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नाशिक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात आयोजित केलेल्या शिक्षक जनता दरबारात सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना पाचारण करावे लागले.
नाशिक विभागातील शिक्षक व शिक्षण उपसंचालक यांच्यात समन्वय साधून त्रस्त शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या पुढाकाराने चार जिल्ह्यांतील शिक्षकांसाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. मात्र, या जनता दरबाराचे कोणतेही नियोजन नसल्याने एकाच वेळी नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित राहिले. शिक्षण उपसंचालक राठोड कार्यालयाच्या समोरील हिरवळीवरील जनता दरबाराच्या ठिकाणी येताच शिक्षकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे राठोड हे आल्या पावली माघारी गेले. यामुळे उपसंचालक शिक्षकांसमोर येत नसल्याने संतप्त शिक्षकांनी घोषणाबाजी करत गदारोळ घातला.
यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मांडले. त्यात वेतन रखडणे, शालार्थ आयडी, शिक्षक व मंडळ मान्यता, सेमी-इंग्लिश मान्यता, वैद्यकीय बिले, सेल्फ फायनान्स, अनुकंपा भरती आदी प्रश्नांमुळे शिक्षकांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
शिक्षण विभाग बनावट शालार्थ आयडी प्रकरणामुळे वादाच्या भोवर्यात अडकल्याने अनेक निर्णय राज्यस्तरावर प्रलंबित असल्याचे शिक्षण उपसंचालक संजय राठोड यांनी स्पष्ट केले. मात्र, या कारणांमुळे शिक्षकांचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास सर्व शिक्षक एकत्र येऊन उग्र आंदोलन छेडतील, असा गर्भित इशारा यावेळी देण्यात आला.
तर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे नाशिक जिल्ह्यातील असूनही नाशिक विभागातील शिक्षकांच्या व्यथा समजून घेतल्या जात नसल्याची नाराजी अनेक शिक्षकांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्रकाश अहिरे, श्रीधर देवरे, सरोज जगताप, राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, प्रदीप सांगळे, दीपक गायकवाड, गोरख कुंदर, शिक्षक सेनेचे संजय चव्हाण, एम. के. वाघ, टीडीएफचे मोहन चकोर, विजय बडे, स्ट्राइक संघटनेचे नीलेश गांगुर्डे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सोमनाथ धात्रक आदींसह महिला शिक्षिका व कर्मचारी आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या तक्रारी व समस्या विभागाला पूर्णपणे ज्ञात आहेत. काही मागण्या शासनस्तरावर असल्याने निर्णयप्रक्रियेत विलंब होत आहे. मात्र, या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
– संजय राठोड, शिक्षण उपसंचालकशिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालयात तसेच पे युनिट कार्यालयात गेल्या एक वर्षापासून एकही काम झाले नाही. खालची यंत्रणा सतत शिक्षक, लिपिक यांच्याकडून आर्थिक मागणी करतात. चकरा मारायला लावतात. एसआयटीच्या नावाखाली काम करत नाही. लई कामे आहे, असे भासवतात. त्यामुळे विभागातील शिक्षकांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाला. हा उद्रेक इतका होता की, पोलीस यंत्रणा नियंत्रणासाठी बोलवावी लागली हे अतिशय वाईट आहे.
-एस. बी. देशमुख, सचिव, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ
हे मुख्य प्रश्न उपस्थित
♦ शाळांमध्ये तातडीने कायमस्वरूपी मुख्याध्यापक नेमावेत.
♦ संस्थाचालकांची मनमानी असलेल्या शाळांमध्ये प्रशासक नेमावा.
♦ गेल्या एक वर्षापासून रखडलेले कंत्राटी शिक्षकांचे वेतन त्वरित अदा करावे.
♦ पवित्र पोर्टलवरील भरतीतून 14 वर्षे कार्यरत शिक्षकांना वगळू नये.
♦ रखडलेल्या शालार्थ आयडींना तातडीने मान्यता द्यावी.
उपसंचालकांच्या दालनात गोंधळ
नियोजनाअभावी झालेल्या जनता दरबारानंतर उपसंचालक संजय राठोड आपल्या दालनात गेल्याने शिक्षक अधिकच संतप्त झाले. उपसंचालकांनी थेट संवाद न साधल्याचा आरोप करत शिक्षकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सिडको : प्रतिनिधी भाजीपाला खरेदीसाठी पायी जात असलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि…
सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…
तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…
सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…