नगरपरिषदेचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण
देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
भगूर शहरातील आठवडे बाजार परिसरातील घनकचर्यामुळे त्रस्त झालेल्या प्रभाग क्रमांक 10 मधील नवीन वसाहत, राजवाडा व दलित वस्ती परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी आता नव्यानेच संकटाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर भगूर नगरपरिषदेने आठवडे बाजारालगतचा घनकचरा हटविला. मात्र, तोच कचरा थेट नवीन वसाहत व राजवाडा परिसरालगत असलेल्या नाल्यात व खड्ड्यात टाकल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी तातडीने हा कचरा हटवून परिसर डास, मच्छरमुक्त करण्याची मागणी केली आहे.
या भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, डास, मच्छर व अस्वच्छतेमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा निवेदने देत घनकचरा अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती. त्यानंतर नगराध्यक्षा प्रेरणा बालकवडे यांनी कचरा हटविण्याची कार्यवाही केली. मात्र, तोच कचरा नागरी वस्तीच्या अगदी जवळ आणून टाकण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचे म्हणणे आहे की, राजवाडा परिसरातून वाहणार्या मोठ्या नाल्यालगत लहान मुले खेळत असतात. कचर्यामुळे परिसर अधिक धोकादायक बनला असून, एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिक भास्कर साळवे यांनी नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांना कचर्याचा व्हिडिओ पाठवून तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली होती. मात्र, तीन दिवस उलटूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी भगूर नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी भगूर येथे आले होते. त्यावेळी आठवडे बाजार परिसरात हेलिकॉप्टर उतरत असताना येथील कचरा हवेत उडाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती.
Garbage is thrown out in the open in Bhagur.