अत्तदीपा विहरथ अत्त सरणा

शेकडो वर्षांपासून चालत आलेली एखादी जीवनशैली नाकारून सर्वसामान्यांना नवदृष्टी देणार्‍या, नव्याने जीवनमार्ग सांगणार्‍या, नव्हे या जीवनमार्गाचे तत्त्वज्ञान सांगणार्‍या, भारताबरोबर  संपूर्ण जगाला प्रभावित करणार्‍या, मानवी जीवनातील चार सत्य म्हणजे दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचे निवारण आणि दुःख निवारण्याचे मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग सांगणार्‍या बौद्ध धर्माचे प्रवर्तक सिद्धार्थ म्हणजेच भगवान बुद्धांचा वाढदिवस अर्थात बुद्धपौर्णिमा! त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या तत्त्वज्ञानावर एक दृष्टिक्षेप टाकण्याचा हा प्रयत्न…
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे भारतात प्राचीन कालखंडात झालेल्या धार्मिक चळवळी, उदयास आलेला बौद्ध धर्म, गौतम बुद्ध आणि त्यांनी सांगितलेला धम्म, बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने देव आणि दैव, आत्मा आणि परमात्मा, स्वर्ग आणि नरक या संकल्पना थोतांड असल्याचे ठासून सांगितले. या तत्त्वज्ञानाने वास्तवदर्शी जीवनशैली कथन केली. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा आहेच. अविनाशी असे जीवसृष्टीत काहीही नाही, असे या तत्त्वज्ञानाचे सांगणे हे त्या कालखंडात जसे क्रांतिकारी स्वरूपाचे होते, तसे ते आजही मार्गदर्शक आहे. शुद्धोधन – मायादेवी यांच्या पोटी सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला. सर्वविदित आहे की, जगातील दुःख कसे नाहीसे होईल व दुःख का होते, याच्या शोधात गौतम बुद्धांनी खूप सारे निरनिराळे मार्ग अनुसरण केले. त्यासाठी त्यांनी स्वतःचा संसार त्यागून ध्यान आणि तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला.
भगवान बुद्धांच्या शिकवणीची सुरुवात जीवनातील अपरिहार्य दु:खांच्या दर्शनाने होते. म्हणून दुःखाची कारणे दूर करून आणि दुःखाचा अंत करून साध्य होणारे निर्वाणाचे अंतिम ध्येय सांगताना, बुद्धांनी दुःखाची कारणे दूर करून दुःख थांबवण्याचा मार्ग सांगितला. बुद्धांची शिकवण व्यावहारिक होती. मानवी जीवन हे दुःखाने भरलेले आहे. याचा बोध होऊन सत्याच्या शोधात निघालेल्या भगवान बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या पाच शिष्यांना पहिला उपदेश दिला. तेव्हा त्यांनी चार सत्यांचे वर्णन केले.
दु:ख –
जगात सर्वत्र दुःख आहे. भगवान बुद्धांच्या शब्दात सांगायचे तर जन्म हे देखील दु:ख आहे, मृत्यू देखील दु:ख आहे, अप्रिय भेट हे देखील दु:ख आहे, प्रिय वियोग हे देखील दु:ख आहे.
दुःख समुदाय-
भगवान बुद्धांनी केवळ दुःखाची जाणीवच केली नाही तर त्याचे कारण समाजाला सांगितले. भगवान बुद्धांच्या दृष्टिकोनातून दु:खाचे मूळ कारण तृष्णा आहे. या इच्छेमुळे, त्याच्या मनात उत्पन्न झालेल्या अहंकार, ममता, राग, द्वेष  इ.मुळे मानव अविद्येच्या अवस्थेत पोहोचतो. आणि वास्तव आणि अवास्तव यामध्ये फरक करणे त्याला शक्य होत नाही.
दु:ख निरोध –
जसा दु:ख आहे, तसाच  अंतही होतो. तृष्णा, अज्ञान हे या दुःखाचे कारण आहे. त्यांचा समूळ नाश केल्याने मनुष्य दु:ख आणि जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. त्याला बुद्ध निर्वाण असे संबोधित करतात.
दुःख निरोध मार्ग –
दु:ख, तृष्णा, अज्ञान कसे थांबवायचे यासाठी बुद्धांनी दुःख निवारणाचा मार्ग म्हणजेच अष्टमार्ग सांगितला.
हे अष्टमार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी होय.
गौतम बुद्धांनी सांगितलेला कर्मवाद, त्यांनी सांगितलेलेे अहिंसेचे तत्त्वज्ञान, अनिश्‍वरवाद, पुनर्जन्मवाद, निर्वाण अशा प्रत्येक पैलूवर जागतिक स्तरावर अभ्यास होत आहे आणि तो चालूच राहील. पाली भाषेतील बुद्धांची अनेक वचने वर्तमानात आपल्याला प्रेरित करतात. गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगातील समस्या म्हणजे कोरोनासारखी महामारी… अर्थात दुःख! पण त्याच्यावरही मार्ग हे अशा स्वरूपाच्या भारतीय तत्त्वज्ञानातच आहे.
महापुरुषाने केलेले उक्ती किंवा विधान हा मोठा संदेश असतो. महापरिनिब्बण सुत्तातील भगवान बुद्धांचा हा  संदेश – ‘अत्तदीपा विहरथ अत्त सरणा’ खूप काही सांगून जातो.
म्हणजे आपण आपल्या द्वीपात विहार करा, आत्मनिर्भर व्हा, स्वतःवर अवलंबून राहा, स्वतःचे आश्रयस्थान व्हा, इतरांवर अवलंबून राहू नका, धम्माला शरण जा.  स्वतःला सिद्ध करा. आणि हे करताना बुद्ध म्हणतात त्यानुसार वाचिक हिंसासुद्धा करू नका. बुद्धांनी सांगितलेले अहिंसा तत्त्वज्ञान व्यापक आहे.
मानवी जीवनात उत्कट असा समतोल निर्माण झाला पाहिजे हे धम्माचे ब्रीद आहे. बुद्ध तत्त्वज्ञान हे  समतेचे, बंधुत्वाचे, स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान आहे. गौतम बुद्धांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती, निर्वाण हा विषय इतका विस्तृत आहे की, त्यावर वारंवार संशोधन होणे, त्याची नव्याने मांडणी होणे व वर्तमानात त्याची सांगड घालणे जसे गरजेचे व महत्त्वाचे आहे, तसेच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे देखील यासाठी हा लेखप्रपंच!
-प्रा. कीर्ती वर्मा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *