नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (136), जिल्हा शाखा नाशिकच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, नाशिक जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचार्यांना आश्वासित प्रगती योजनेचा (कालबद्ध पदोन्नती) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी पदोन्नतीच्या अंतिम आदेशावर स्वाक्षरी केली. या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण असून, युनियनच्या वतीने पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन आणि युनियनच्या सूक्ष्म नियोजनामुळे हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. निर्गमित आदेशानुसार 12 वर्षांचा पहिला लाभ 3 सभासदांना, 10 वर्षांचा पहिला लाभ 44 सभासदांना, 20 वर्षांचा दुसरा लाभ 134 सभासदांना, तर 30 वर्षांचा तिसरा लाभ 23 सभासदांना देण्यात आला आहे.
यावेळी त्यांनी ग्रामपंचायत अधिकार्यांना ग्रामीण भागातील मूलभूत सोयीसुविधांसोबतच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ आणि ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 50 मीटर परिसरात जंक फूड अर्थात अस्वच्छ व अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही, याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाने गांभीर्याने पार पाडावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. वर्षा फडोळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, कार्यालयीन अधीक्षक मंगेश चव्हाण आणि वरिष्ठ सहाय्यक विजय सावळे यांच्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाला युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रमोद ठाकरे, चेअरमन दत्तात्रय गायकवाड, सरचिटणीस संजय गिरी, उपाध्यक्ष तुकाराम गावित, कोषाध्यक्ष सुनील निकम आणि प्रसिद्धिप्रमुख वैभव निकम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
‘संघटन हीच आपली ताकद आणि कर्तव्य हीच आपली ओळख’ या ब्रीदवाक्याप्रमाणे संघटनेचे काम सुरू असून, कर्मचार्यांच्या हक्काचे लाभ मिळवून देतानाच प्रशासकीय मोहिमा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित सामाजिक जबाबदार्या पार पाडण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी सदैव तत्पर राहतील, असे प्रमोद ठाकरे (जिल्हाध्यक्ष) आणि संजय गिरी (सरचिटणीस)
यांनी सांगितले.
उर्वरित पात्र कर्मचार्यांना दोन महिन्यांत लाभ
सत्काराला उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले की, सध्या 205 कर्मचार्यांना लाभ देण्यात आला असून, संवर्गातील जे कर्मचारी योजनेसाठी पात्र ठरतील, त्यांनाही येत्या दोन महिन्यांत कालबद्ध पदोन्नतीचा लाभ दिला जाईल.
जंक फूडमुक्त शाळांसाठी प्रयत्न
मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी प्रशासनाने सोपविलेली कर्तव्ये वेळेत पार पाडतील, असे आश्वासन दिले. शालेय विद्यार्थी हे राज्याचे आणि देशाचे उज्ज्वल भविष्य असून, त्यांच्या आरोग्यासाठी तसेच शाळा परिसर जंक फूडमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी संवर्गातील सर्व कर्मचारी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील, असे त्यांनी सांगितले.
Benefits of the ‘Pragati’ scheme for 205 Gram Panchayat officers and employees.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…