जून-जुलै महिना सुरू झाला की, निसर्गासोबतच मनही नव्या उत्साहाने बहरून येतं. रिमझिम पावसाच्या सरी, ओल्या मातीचा दरवळणारा सुगंध आणि शाळा सुरू होण्याची लागलेली उत्सुकता या सगळ्यांची एक वेगळीच जादू असते. पाऊस आणि शाळा यांचं नातं इतकं घट्ट आहे की, पावसाच्या पहिल्याच सरींसोबत बालपणातील शाळेच्या असंख्य आठवणी मनात अलगद जाग्या होतात.
ये रे ये रे पावसा,
तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा,
पाऊस आला मोठा…
हे गाणं गुणगुणत पावसात चिंब भिजत शाळेत जाण्याचा आनंद वेगळाच आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वीची तयारी हा एक छोटासा उत्सवच असायचा. नवीन पुस्तके, वह्या, दप्तर, छत्री, घोंगडी यांची खरेदी, नवीन पुस्तकांचा दरवळणारा सुगंध आणि पहिल्या दिवसाची उत्सुकता आजही मनाला तितकीच आनंदी करून जाते.
शाळेत जाण्यासाठी आमचा मैत्रिणींचा एक छान गट होता. आजसारख्या शाळेच्या बस नव्हत्या. आम्ही वेगवेगळ्या मळ्यांतून एकमेकींना घेत, गप्पा मारत शाळेकडे निघायचो. आमचा चिवचिवाट अगदी चिमण्यांच्या थव्याप्रमाणे असायचा. वाटेत कुणाला हाक मारायची, कुणाला सोबत घ्यायचं आणि पाहता पाहता आमचा मोठा ग्रुप तयार व्हायचा. त्या गप्पा, ते निरागस हास्य आणि मैत्रीची ऊब आजही मनात ताजी आहे.
पाऊस सुरू झाला की मनात एकच प्रश्न यायचा-
सांग सांग भोलानाथ,
पाऊस पडेल का?
शाळेभोवती तळे साचून
सुट्टी मिळेल का?
सुट्टी मिळण्याची कल्पनाच चेहर्यावर आनंद फुलवून जायची.
या आठवणींमध्ये एक प्रसंग मात्र कायमचा मनात कोरला गेला आहे. मी चौथीत शिकत होते. त्या काळी बहुतेक मुलं कापडी पिशवी घेऊन शाळेत जायची. पण, आमच्या वर्गातील एका शिक्षकाच्या मुलीकडे सुंदर स्कूल बॅग होती. ती पाहून मलाही तशीच बॅग हवी होती. मी दादांकडे हट्ट धरला आणि दुसर्याच दिवशी त्यांनी मला ती बॅग आणून दिली. त्या क्षणी झालेला आनंद आजही आठवला की, चेहर्यावर नकळत हास्य उमटतं.
कधी सायकलने, तर कधी पायी शाळेत जाणं, वाटेत पावसात भिजणं आणि मैत्रिणींसोबत केलेली धमाल हे सारे क्षण आयुष्याची अमूल्य ठेव बनून राहिले आहेत. त्या काळी पाऊस म्हणजे त्रास नव्हता; तो तर आनंदाचा उत्सव होता.
शाळेतील मित्र-मैत्रिणी, वर्गातील खोड्या, मधल्या सुट्टीतील गप्पा आणि शिक्षकांचं प्रेमळ मार्गदर्शन यांनी प्रत्येक दिवस संस्मरणीय केला.
आज शाळेच्या व्हॅनमधून जाणार्या मुलांचा गोंगाट, सायकलवरून जाणार्या विद्यार्थ्यांच्या गप्पा आणि त्यांच्या चेहर्यावरचं निरागस हास्य पाहिलं की, नकळत आपले शाळेचे दिवस डोळ्यांसमोर
उभे राहतात.
पूर्वी आम्ही स्वतःच्या वेळेवर स्वतः तयार व्हायचो. आज मात्र आपल्या मुलांना शाळेसाठी तयार करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मुलींच्या वेण्या घालताना, आई, वेणी नीट नाही झाली! अशी हाक अनेकदा ऐकावी लागते. दुसर्या दिवशी डब्यात काय द्यायचं, याचाही विचार आधीपासून सुरू असतो. हे सगळं करताना नकळत आपल्या आईची आठवण येते आणि तिच्या प्रेमाची, संयमाची व त्यागाची नव्याने जाणीव होते.
खरंच, शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी संस्था नाही; ती आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा सुंदर आठवणींचा खजिना आहे. काळ बदलतो, साधनं बदलतात, जीवनशैली बदलते; पण शाळेच्या आठवणी, पावसाचा सुगंध आणि त्या दिवसांचा निरागस आनंद मात्र कधीच बदलत नाही. म्हणूनच प्रत्येक पावसाळा नकळत आपल्याला पुन्हा एकदा बालपणात घेऊन जातो.
Childhood returned with the showers of rain.
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…