गन्तव्य लग्न

काय हे शीर्षक ?
‘लग्न नि कर्तव्य’-हे दोन्ही हातात हात घालून जातात, म्हणजे अगदी, यंदा कर्तव्य आहे पासून ते संसार सुरळीत निभावण्यापर्यंत. ‘गन्तव्य’ चं काय ते नविनच! प्रथम ऐकलं, तेव्हा मला असं वाटलं खरं. एका मित्राचा फोन आला होता, त्यांच्या लेकीच्या लग्नाचं आमंत्रण करण्यासाठी. त्याना फार सवय आहे बाई शब्दशः भाषांतरांची. 2 दिवस राखून ठेवायचेच्चैत आहेत तुम्ही ! गन्तव्य लग्न आहे. म्हंजे ?
अशा भुवया उंचावलेल्या दिसतायत मला फोनमधूनही पण ते आपलं माझ्या स्टाईलने केलेलं भाषांतर आहे डेस्टिनेशन वेडिंग चं !
उत्साहाने आमंत्रण करून त्यांनी फोन ठेवला देखील
गन्तव्य शब्द ऐकला तेव्हा रेल्वे प्लॅटफॅार्मवरच्या इंडिकेटरवर गन्तव्य स्थान असं लिहिलेलं असतं त्याचीच प्रथम आठवण झाली.
डेस्टिनेशन बुक करायची फॅशन आलीये हे कळल्यावर मला अंमळ भारी वाटलं खरं ! लग्नाला जाण्यासाठी लग्नाच्या दिवशी सक्काळी निघायचं ठरलं. खरं म्हणजे मुहूर्त दुपारी 12.44 चा !
डेस्टिनेशन म्हणजे अगदी पेशव्यांच्या वाड्याचा फील देणारं असं ! चहूबाजूंनी, वरपक्ष-वधूपक्ष-निमंत्रितांसाठीचे अगदी दक्षतेने सजवलेले सुरेख कक्ष ,पाचेक पायरया वर चढून प्रवेश केल्यानंतर लगेच नजरेत भरले.
मध्यभागी, लग्नविधी नि लग्न लागण्यासाठीचं स्टेज तसं ‘ग्राऊंड लेव्हलला’ होतं. नि वरती मात्र मोकळं आकाश. नेत्रसुखद सजावटी खरोखर लाजवाब. पण
एकीकडे मध्यभागी लग्नविधी सुरू होते नि दुसरीकडे किशोरवयीन, नवयौवना, नुकतंनुकतं प्रेम होऊ घातलेल्या जोड्या-ह्या सगळ्यांचं ‘सेल्फी‘ घेणं सुरू होते. तस्मात् ह्या ‘सेल्फी-विधीं’ ना मी ‘लग्न कुणाचे सेल्फी कुणा’ असं नाव मनोमन बहाल करून टाकलं.
नवनविन फॅशन्स, उंची उंची साड्या, डिझायनर ज्वेलर्‍या बघताना नि अवती भवतीच्या तरूणाईचा वावर अनुभवतांना बर्‍याच गॅपनंतर मन ताजं तवानं होऊन गेलं हो ! इतकं की, वैदिक पध्दतीचे विधी संपल्यानंतर अंतरपाटापुढे वधू-वरांना आणायच्या आधीच्या मधल्या वेळात अस्मादिकानीही छोट्टंसं फोटो सेशन उरकून घेतलं. काय करणार ? अहो, ऊझ बदलायची देखील एक प्रकारे सामाजिक बांधिलकी झालेय अन् काय ! ‘लग्न लागलं की लगेच डायनिंग हॅालकडे वळू ‘असा विचार झालाच होता सगळ्यांचा पण तोवर‘आमच्या वेळचं काही बोलायची सोयच नाही’ असं म्हणत म्हणत त्याच आठवणींमध्ये रममाण होण्याचा प्रयत्न करीत होती मंडळी. मुहूर्त-पालनाची सीमा साफ दुर्लक्षून वराचा घोडा दृष्टीस पडला. वर-माय , वर-पिता,नि जवळच्या सगळ्याच मंडळींच्या उत्साह-उधाणाचं नृत्यात परिवर्तन झालं. पाठोपाठ वधू-पालखी ही सामिल झाली अन् काय!सगळं साग्रसंगीत तर होतंच परंतु हे समग्र नाचकाम पूर्ण होऊन अंतरपाटाशी पोचेपर्यंत सव्वा वाजून गेला होता. ‘मुहूर्त टळून गेल्याची ही परिसीमाच की !’ कमालच ! मग मुहूर्त काढला तरी कशाला म्हणते मी’ अशी वरिष्ठ कुजबुज एव्हाना वाढणं सहाजिकच होतं. त्यानंतर सुमारे वीसेक मिनिटं वधूपक्षातल्या -वरपक्षातल्या हौशी मंगलाष्टकांनी राज्य केल्यानंतर गुरूजींना तदेव लग्नं म्हणायची संधी मिळाली सगळी पुढे एक वेगळीच स्पर्धा सुरू झाली. नवरा -नवरीला जास्तीत जास्त उंच करायची !
‘ हार घालण्यात कोणी आधी हार मानायची ?’
हा सगळा डेस्टिनेशनचा घाट घातला ती सरताज क्रिया करायला
सर झुकवायला कोणताच पक्ष तयार होईना.
फायनली , झालं ते हाराहारी प्रकरण
कपड्यालत्त्यात कटाक्षाने आणलेली पारंपारिकता , जागोजागी सजावटीच्या रूपात ठळकपणे दिसून आलेली सुबत्ता ह्यांनी परिपूर्ण अशा त्या डेस्टिनेशन वेडिंग चा अनुभव म्हटलं तर सुखद नि म्हटलं तर अनेक बदल अधोरेखित करणारा असा होता. बदल , बदलांचा वेग स्विकारून पुढे जावच लागतं हे तर खरं !
‘मुहूर्ताचं महत्व’ इतकं बदलावं ?
‘ वेळ साजरी करणं’, ‘ वेळ निभावून नेणं’, अशा सहजीवनातल्या अन्य बाबीही बदलल्या तर कसं निभावं? अशा अनेक विचारांनी परतीच्या वाटेवर मनात पिंगा घातला.

अनुजा बर्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *