संपादकीय

जो कधी चुकला नाही, त्याला माणूस म्हणावे तरी कसे?

मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. जो कधी चुकतच नाही तो माणूसच नाही, असे म्हटले तर ते अनुचित ठरणार नाही. कारण पृथ्वीतलावर प्रत्येक माणूस जीवनात कधी ना कधी तरी चुकतोच. चुका स्वीकारून आणि चुका सुधारून जीवनात योग्य असा बदल करणे आणि योग्य दिशेने वाटचाल करणे प्रत्येक माणसाचे परमकर्तव्य असते.
मानवी जीवनात चुका होणे स्वाभाविक असते. जीवनात झालेल्या चुका सुधारून योग्य दिशेने मार्गक्रमण केल्यास यश नक्की पदरात पडतेच. फक्त त्यासाठी माणसाने थोडा धीर धरायला हवा व संयम ठेवायला हवा. बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत माणूस जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कळत नकळतपणे चुका करतच असतो. एखादा मनुष्य खूप ज्ञानी व बुद्धिवान प्राणी आहे. त्याने उच्च शिक्षणाचा पर्वत लीलया सर केला आहे. तो मोठ्या पदावर मोठा अधिकारी आहे. त्याने खूप पुस्तकांचे वाचन करून ज्ञान ग्रहण केले आहे. त्याच्याकडे प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान आहे. तो ज्ञानसम्राट व बुुद्धिसम्राट म्हणून ओळखला जातो. म्हणून अशा ज्ञानी व गुणी माणसांकडून चुका होणार नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. मानवी जीवनात आलेले अपयश हे माणसाच्या चुकीमुळेच येत असते. माणसाने अभ्यास कमी केल्यामुळे व पुस्तकांचे वाचन कमी केल्यामुळे माणूस परीक्षेत नापास होतो. माणसाच्या जीवनात अपयश येते म्हणजेच माणूस कुठेतरी चुकतो आणि त्यामुळेच यशाला मुकतो.
जीवनात एखादी चूक झाल्यामुळे व त्या चुकीतून अपयश आल्यामुळे माणसाने खचून न जाता व हिंमत न हारता खूप खूप अभ्यास करून व जीवनाची वाटचाल योग्य दिशेने करून यशाला काबीज करणे माणसाचे परमकर्तव्य असते. जीवनात एक-दोन चुका झाल्यामुळे माणूस संपतो असे नाही, जो माणूस झालेल्या चुका स्वीकारून व आलेल्या अपयशाला पचवून जिद्दीने पेटून उठतो आणि यशाला पादाक्रांत करतो तो माणूस खरा माणूस म्हणून ओळखला जातो. या जगात ज्या माणसाच्या हातून एकही चूक झाली नाही असा माणूस दुर्मिळ असेल किंवा कदाचित नसेलही. पृथ्वीतलावर मनुष्यप्राणी सोडून इतर जेवढे काही प्राणी आहेत, त्या प्रत्येक प्राण्याने त्याच्या जीवनात कधी ना कधीतरी कळत नकळतपणे चुका केलेल्याच असतात. लहानपणी माणसाचे मन एक खुली किताब असते.
आपल्या सभोवताली जे काही घडत आहे, मग ते चांगले असो वा वाईट ते मन लावून वेचण्याचे काम माणसाचे बालमन करत असते. एखादा मनुष्य जीवनात चुकला म्हणून त्याला कठोर शिक्षा देणे मला तर चुकीचे वाटते. जीवनात चुका तर होतच असतात. फक्त झालेल्या चुकीचे अपयशातून यशात रूपांतर करून जीवनात यशस्वी व्हायचे असते. माणसाला एखादे ठराविक ईप्सित साध्य करायचे असेल तर अगोदर हजारो चुका सहन कराव्या लागतात, तेव्हा कुठे माणसाला इच्छित फळ मिळते. जीवनात शंभर चुका झाल्या म्हणजे सर्व काही संपले असे होत नाही. तर त्या शंभर चुकांचा अनुभव घेऊन 101 वेळा यशाला पायाशी लोळण घ्यायला लावणे, हा माणसाचा खरा पुरुषार्थ असतो. या जगात जेवढे काही महापुरुष, संत, महात्मे, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार असो वा आमदार या प्रत्येकाने त्या पदावर जाण्याआधी खूप वेळा चुका केलेल्या असतात. म्हणजेच त्यांना खूप वेळा अपयशाला सामोरे जाऊन यशाला गवसणी घातलेली असते. म्हणून मित्रांनो, जीवनात स्वतःच्या चुकीमुळे आलेल्या अपयशाला न घाबरता व न डगमगता मोठ्या हिमतीने त्या अपयशावर मात करावी आणि आपली चूक सुधारावी. चुकीतून अपयश आणि अपयशातून यश असे एकानंतर एक येतच असते.
राजकारणी, उद्योजक, खेळाडू, डॉक्टर, अभियंता व चित्रपटातील अभिनेता व अभिनेत्री बनण्यासाठी माणसाला जीवनात खूप वेळा चुकावे लागते. खूप खूप संघर्ष करून, जीवनात झालेल्या चुका सुधारून यशाला आपल्याकडे खेचून आणलेले असते. दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत एखाद्याच्या वाट्याला अपयश आले म्हणून त्याने खचून न जाता आपल्याला जीवनात अपयश कशामुळे आले? आपण जीवनात कोणत्या कोणत्या चुका केल्या? याची पडताळणी करून व झालेल्या चुका सुधारून परत जोमाने अभ्यासाला लागावे आणि यशाला आपल्या पदरात पाडावे.
एखादा राजकीय उमेदवार निवडणुकीत पराभूत झाला म्हणून त्याने आपले सगळे संपले, असा विचार करणे साफ चुकीचे आहे. आपण निवडणुकीत पराभूत झालो हे मान्य करून, आपण निवडणुकीत कशामुळे पराभूत झालो? आपण काय काय चुका केल्या? या सर्व गोष्टींचा विचार करून आणि त्या चुकांना सुधारून पुढील वाटचाल केली पाहिजे. नक्कीच यश तुमच्या पायाशी लोळण घेतल्याशिवाय राहणार नाही. काही महाभाग एखाद्या क्षेत्रात अपयश आले म्हणून प्रयत्न करायचे सोडून देतात किंवा जीवाचे बरे-वाईट करून घेतात. त्यांना हे कळत नाही की जीवनात तोच चुकतो जो काहीतरी बनण्याचे प्रयत्न करतो. फक्त आपल्याला गरज आहे,
ती आपल्या वाट्याला आलेल्या चुका सुधारून त्या अपयशाचे यशात रूपांतर करून जीवन ध्येय काबीज करण्याची. परीक्षेत कित्येक वेळा अपयश आलेली मुले अपयश कशामुळे व का आले? म्हणून त्या चुका शोधतात आणि त्या चुकांची दुरुस्ती करून पुन्हा मैदानात उतरतात आणि आपले ठराविक ध्येय साध्य करतात. चूक, अपयश आणि यश या तिघांचा संबंध फार जवळचा आहे. एखादी चूक झाली म्हणून घाबरून आपली दिशा बदलायची नसते, तर ती चूक सुधारून पुन्हा नव्याने जीवनाच्या ध्येयाकडे वाटचाल करायची असते. जो कधी चुकला नाही त्याला माणूस म्हणावे तरी कसे?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली

सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…

4 minutes ago

मालेगावात प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त

तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…

11 minutes ago

तरुणाचा आयफोनचा हट्ट; संभाजीनगरात संपले कुटुंब!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…

17 minutes ago

राज्यातील पोलीस ठाण्यांच्या रचनेत मोठे बदल

सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…

27 minutes ago

‘पॅलेट गन’प्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…

39 minutes ago

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

21 hours ago