प्रभू रामचंद्रांना लाभलेल्या देवत्वाप्रमाणेच रामाच्या परिवारातील भक्त हनुमंतालासुद्धा देवत्व लाभलेले आहे. भारतातील कोणत्याही लहानमोठ्या गावात मारुतीचे मंदिर नाही असे एकही गाव सापडणे मुश्कील आहे. सामान्यजनांना मारुती त्यांच्याजवळचा आप्त, स्वकीय वाटतो. रामभक्त हनुमान अनेक दृष्टीने अपूर्व आहेत.
राम एवं परं ब्रह्मं
राम एवं परं तपः ।
राम एवं परं तत्त्वं श्रीरामोबहनादरम् ॥
श्रीराम आणि हनुमान ही अविभाज्य जोडी मानली जाते. रामभक्त जो रामापासून विभक्त नाही असा भक्त आदर्श रामसेवक म्हणून मारुतीच्या उपासनेचे सांप्रदाय भारतवर्षातील सर्व प्रांतातून रूढ झालेले दिसतात. आजही ज्या ज्या ठिकाणी रामकथा सांगितल्या जातात त्या-त्या ठिकाणी ती कथा ऐकण्यासाठी हनुमंत कोणत्या ना कोणत्या रूपाने हजर असतात अशी श्रद्धा आहे. हनुमंताने प्रत्येक गोष्टीची सुरुवात रामनामाने, प्रत्येक गोष्टीचे ध्येय निश्चित करून त्यास प्रयत्नांची जोड देत यशस्वीरीत्या पार पाडलेले आहे.
मनोजवं मारुततुल्यवेगमं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥
रामरक्षेमधील या श्लोकाने श्री हनुमंताचे ध्यान केले जाते. मनाप्रमाणे अथवा वायूप्रमाणे ज्याचा वेग आहे, ज्याने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवून ती जिंकली आहेत, असा जितेन्द्रिय, बुद्धिमत्तेमध्ये जो श्रेष्ठतम आहे असा वायुपुत्र आणि वानरदलांचा प्रमुख अशा रामदूत हनुमानाला मी शरण जातो. अंगी जाज्वल्य भक्ती, मनात असलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या आसुरांवरही विजय प्राप्त केलेले व जे काही घडले आहे ते श्रीरामाच्या शक्तीमुळेच घडले आहे, असे अंतःकरणापासून भावना असलेले श्री हनुमान आपल्या सर्वांचे आराध्य आहे.
चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयसमयी मारुतीचा जन्म झाला. आकाशातील उगवता सूर्य खेळण्यातील चेंडू आहे असे वाटून त्याला घेण्यासाठी मारोतीने आकाशात उड्डाण केले. ते पाहून इंद्राला राग आला व त्याने आपले वज्र मारुतीवर फेकले, ते मारुतीच्या हनुवटीला लागून जखम झाली व तो खाली पडला. तेथे पर्वताला मोठा खड्डा पडून तो दुभंगला. एका अर्भकाचे हे सामर्थ्य पाहून सारे देव चपापले आणि मारुतीचे हनुमंत हे नाव पडले. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला चिरंजीव हनुमान यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. शनिवार व मंगळवार हे हनुमानाचे पूज्य दिवस मानले जातात.
रामरहस्य उपनिषदात हनुमंताचा गुरू स्वरूपात स्वीकार केला गेला आहे. सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार, शांडिल्य, मुदगल इ. ऋषींनी हनुमंताकडून रामतत्त्वाचे ज्ञान प्राप्त केले आहे. बलभीम, मारुती, अंजनीसुत, पवनसुत, महारुद्र, रामदूत, महाबली, अनुमंडन, संकटविमोचक अशा अनेक नावांनी हनुमंत ओळखले जातात. महाभारतात ’मारुतात्मज’ या नावाने त्याचा उल्लेख आढळतो. हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. हनुमानाचे आणि रुद्राचे नाते पुराणकाळात निर्माण झाले असावे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. अंगभूत गुणांमुळे हनुमानास रुद्रावतार मानले जातो. रुद्र हे अकरा आहेत. हनुमान रुद्र आहे म्हणून हनुमानाची गणना एकादश रुद्रांत केली जाते. भीम हे एकादश रुद्रांतीलच एक नाव आहे. हनुमंताला भीमरूपी महारुद्र असेही म्हटले जाते. हनुमंताला संगीतशास्त्राचा एक प्रमुख प्रवर्तक मानतात. प्राचीन संगीताचार्यांसोबत अंजनेयचा उल्लेख येतो. समर्थ रामदासांनी हनुमानाची गायनी कळा ध्यानात घेऊनच त्याला ’संगीतज्ञानमहंता’ म्हणता म्हणून संबोधले आहे, तसेच अचूक कार्यसिद्धी करणारा महावीर बुद्धिमान व शक्तिमान असे हनुमंताचे रूप वर्णिले आहे
दासमारुती व वीरमारुती अशी हनुमंताची दोन रूपे मानली जातात. दासमारुती राममंदिरात रामापुढे विनम्रतेने हात जोडून उभा असतो. हनुमंताचे महावीर हे नाव तर प्रसिद्धच आहे. वीरमारुती युद्धाच्या पावित्र्यात असतो. वीर मारुतीची मंदिरे स्वतंत्र असतात. वीर मारुतीची मंदिरे बहुधा गावाच्या वेशीपाशी असतात. जेथे राम असतो तेथे हनुमान असतो, पण दोन्ही हात जोडलेला दासमारुती! पण जेथे तो एकटा असतो, तेथेसुद्धा तो वीर स्वरूपातील असतो. सज्जनांचा दास, पण दुर्जनांचा कर्दनकाळ असलेला वीरमारुती, असा या दोन मूर्तींमधील भावार्थ आहे.
सदा देवकाजी झिजे
देह ज्याचा।
सदा रामनामे वदे नित्य वाचा ॥
मना पावना भावना राघवाची ।
घरी अंतरी सोडि
चिंता भवाची ॥
अहो ज्या नरा
राम विश्वास नाही ।
तया पामरा बाधिजे
सर्व काही ॥
मारुतीचे व्यक्तिमत्त्व पूर्णतः रामभक्तीने भिजलेले आहे, त्या मारुतीला वंदन करताना म्हणूया….
भक्त तो राम मंदिरी । मारुती श्रेष्ठ संगरी । जळी स्थळी नि अंबरी । वाजवी राम बासरी । श्रेष्ठ बुद्धिवान जरी । अहंकार नसे तरी । राम नांदे त्याच्या उरी । तोच त्याचा सख्या हरी । भक्ती त्याची रत्नापरी । रामदास खरोखरी । श्रेष्ठ रामदरबारी । भक्ती मंत्र तो उच्चारी । पूजा त्याची घरोघरी । अमर तो चराचरी ॥ हनुमंताचे ग्रामरक्षक स्वरूप, त्याचे अलौकिक शरीरबल व शौर्य यांसारख्या गुणांमुळे तो लोकप्रिय आहे. बुद्धी, बल, कीर्ती, धैर्य, निर्भयता, निरोगीपणा, चपलता आणि वाक्पटूता असा हा मारुती अष्टगुणी आहे. आपण आणि आपल्या कुटुंबातील सर्वांमध्ये, त्याच्याकडून या अष्टगुणांची सतत कृपा होत राहावी, हाच बलभीम मारुतीच्या उपासनेमागील भावार्थ आहे. हनुमानासारखी जाज्वल्य भक्ती करून मन व देहाचे शक्तिबल वाढवावे, हा हनुमान जयंतीचा संदेश आहे.
Jitendriya Buddhimat Senior.
खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…
खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…
शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…
सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…
कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…