नाशिक

कुंभमेळा लोगोवरून धार्मिक व तात्त्विक चर्चेला उधाण

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत लोगोबाबत धार्मिक व तात्त्विक पातळीवर चर्चा सुरू झाली असून, अनेक भाविकांनी त्यामधील काही संकल्पनात्मक उणिवांकडे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी आपली भूमिका मांडत लोगो अधिक सर्वसमावेशक, पौराणिक संदर्भांनी समृद्ध आणि सनातन तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करणारा असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर महंत सुधीरदास पुजारी तसेच त्र्यंबकमधील काही साधू-महंत यांनीही लोगोमध्ये धनुष्यबाण असावा यांसह इतरही काही बदल सुचविले आहेत.
महंत अनिकेतशास्त्री महाराज म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून, सनातन वैदिक परंपरा, अध्यात्म, अमृततत्त्व आणि देव-दानव समुद्रमंथनाच्या दिव्य इतिहासाचा जिवंत वारसा आहे. त्यामुळे अशा महान आध्यात्मिक पर्वाच्या लोगोमध्ये केवळ कलात्मकता नव्हे, तर गूढ तात्त्विक संदेश, पुराणातील संदर्भ आणि सनातन संस्कृतीचे व्यापक दर्शन अपेक्षित असते.
सध्याच्या लोगोमध्ये दाखविण्यात आलेला कलश हा कुंभमेळ्याचा मुख्य प्रतीक असला तरी, त्या कलशातून त्रिशूळाच्या आकाराची प्रतिमा दर्शविणे संकल्पनात्मकदृष्ट्या अपूर्ण वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. समुद्रमंथनावेळी प्रकट झालेल्या अमृतकुंभामुळेच कुंभपर्वाची परंपरा निर्माण झाली. त्यामुळे लोगोमध्ये अमृताचे थेंब, दिव्य तेज किंवा अमृतकिरण दाखविले असते तर मूळ पौराणिक तत्त्व अधिक प्रभावीपणे समोर आले असते, असे त्यांनी सांगितले. तसेच, भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र लोगोमध्ये समाविष्ट केल्यास त्याला अधिक व्यापक आध्यात्मिक आणि पौराणिक अर्थ प्राप्त झाला असता, असे मतही त्यांनी व्यक्त केले. समुद्रमंथनाच्या कथेत भगवान विष्णूंची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने सुदर्शन चक्र हे धर्मसंस्थापन, अमृतरक्षण आणि दैवी संतुलनाचे प्रतीक मानले जाते. कुंभमेळा हा केवळ शैव परंपरेपुरता मर्यादित नसून, वैष्णव, शैव, शक्त, योग आणि आखाडा परंपरांचा महासंगम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
त्रिशूळ हे भगवान शिवांचे दैवी आयुध असून, त्याचे स्वतंत्र महत्त्व आहे. मात्र, कलशातून त्रिशूळ निघत असल्याचा आभास काही प्रमाणात प्रतीकात्मक विसंगती निर्माण करतो. कलश हा अमृत, जीवन, पवित्रता आणि मोक्षाचे प्रतीक आहे; तर त्रिशूळ हे संहार, संरक्षण आणि त्रिगुण नियंत्रणाचे प्रतीक आहे. त्यामुळे कलशातून अमृताचे थेंब, दिव्य प्रकाश किंवा तेजस्वी किरण बाहेर पडताना दाखविले असते तर कुंभमेळ्याचा मूळ आत्मा अधिक प्रभावीपणे व्यक्त झाला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही भगवान शिवाशी संबंधित पवित्र तीर्थक्षेत्रे असली तरी सिंहस्थ कुंभमेळ्याची कथा समुद्रमंथनाशी जोडलेली असल्याने लोगोमध्ये शिवतत्त्वासोबत विष्णुतत्त्व आणि अमृततत्त्व यांचा समतोल आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सुदर्शन चक्र, अमृताचे थेंब, दिव्य कलश आणि गोदावरीच्या पवित्र लहरी यांचा समन्वय लोगोला अधिक तात्त्विक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक परिपूर्णता देऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त
केले.

Kumbh Mela logo sparks religious and philosophical debate

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

12 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

31 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

38 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

47 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

55 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago