बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे नकळत ओले होतात.
परवा का कुणास ठाऊक पण मनाच्या एका कोपर्यात अलगद जपून ठेवलेले क्षण डोळ्यासमोरून फिल्मसारखे एक एक पुढे सरकत गेले… त्या आठवणींच्या सरीमध्ये मला चिंब भिजवत…
आजही या कडक उन्हात डोळे मिटले की, माझ्या चाळीतल्या त्या छोट्या घरासमोरच्या उंबराच्या झाडाचा गारवा मनाला नाही तर हृदयाला थंड करतो… शाळेतून दुपारी घरी आल्यावर मस्त तो ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही बघत दूध, पोहे खायला घ्यायचे आणि त्यात चुकून कोणाच्या केबलवरचा प्रोग्राम दिसला तर तो द्विगुणित झालेला आनंद या महागड्या मोठ्या कलर एलसीडीसमोर बसून चटकदार पदार्थ खाण्यातसुद्धा नाही.
गच्चीचा तो कोपरा नकळत कधी माझ्या रंगात रंगून गेला कळलंच नाही.. लहान असताना त्याच कोपर्यात भातुकली खेळायचे तेव्हा तो पण माझ्यासोबत लहान झाला… शाळेतला अभ्यास करताना माझ्यासोबत तोही अभ्यास करू लागला… आणि मोरपंखी स्वप्न बघताना जणू तोही माझ्यासोबत तरुण झाला.. शाळेतून येताना 1-2 रुपयाची आइस्क्रीम घ्यायची, नाही तर पेप्सी.. मस्त सीतागुंफावरून यात्रेकरूंची गंमत बघत खात खात यायचं पुढे काळारामाच्या मंदिरात. सभामंडपात थोडं खेळायचं, थोडा अभ्यास करायचा आणि माझा प्रिय सखा रामरायाच्या मूर्तीसमोर उभं राहून मनातल्या मनात त्याच्याशी खूप गप्पा मारायच्या. काही सण वगैरे असेल तर आदल्या दिवशी मी व माझा भाऊ, अजून बाकीची मुलं अशी आमची वानर सेना आदल्या रात्री जाऊन मंदिर झाडून घ्यायचो. सडा मारून सर्व मंदिरात रांगोळी काढायची… आता प्रत्येक सणाला शक्य होत नाही, पण जमेल तसं नक्की करतो.. पण आजही इतके वर्षे होऊनही रांगोळीची प्रत्येक रेघ ओढताना जुना बालपणीचा मातीचा तो सुगंध आसमंतात दरवळतो..अन् रामरायाच्या मूर्तीकडे बघितलं की, त्याच्याशी काहीपण बालिश गप्पा मारणारी मी मला त्याच्या डोळ्यात दिसते..
खरंच छान, सुंदर, अप्रतिम अनमोल.. हे शब्दसुद्धा कमी पडतील असं शब्दातीत बालपण होतं ते….सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मोबाइल नव्हता त्यामुळे मनोरंजनासाठी एक तर गोष्टीची पुस्तकं वाचायची, नाही तर बाहेर जाऊन आईचा ओरडा खायीपर्यंत खेळत बसायचं. लपाछपी, डोंगर का पाणी, तळ्यात-मळ्यात, गिलोरी, दोरीवरच्या उड्या, लंगडी पळी, पकडापकडी, मामाचं पत्र हरवलं…. असे अनेक खेळ. कमी जागा होती खेळायला तरी खेळत होतो.. आणि आज पोरांना बळजबरीने ग्राउंडवर खेळायला पाठवावं लागतं. उन्हाळ्यात तर गंगेवर जायचं म्हणून हट्टच करायची पोरं, कारण आमचा वॉटर पार्क म्हणजे आमची गोदामाई.. पाण्यात पाय सोडून पाण्याचा होणारा तो मऊ स्पर्श त्याच्या छोट्या छोट्या लहरींचा होणारा मधुर ध्वनी आणि अलगद गुदगुल्या करणार्या वार्याच्या झुळुकेसोबत भत्ता खाण्यात जी मज्जा व आनंद होता ना तो कितीही मोठ्या 5-7 स्टार हॉटेलमध्ये बसून ते कृत्रिम संगीत ऐकत अगदी स्वादिष्ट पदार्थ खाण्यात नाही.
वडील नेहमी म्हणतात काय दिवस होते ते आमचे..मला तेव्हा ते काय सारखं सारखं तेच सांगता असं वाटायचं.. पण आज जेव्हा माझे बालपणीचे ते दिवस, त्याचा तो पवित्र चैतन्यमय सुगंध मागे ठेवून कापरासारखे उडून गेले तेव्हा ते का सारखं असं म्हणतात याचा अर्थ उमगला.
हो मी त्या दिवसांना पवित्र चैतन्यमयच म्हणेल. कारण सायंकाळी घरात मंगलमय वातावरण होतं. दिवे लागणीला देवापुढे शुभं करोती म्हटली जायची..घरात संवाद होता.. आजीच्या गोष्टी होत्या.. अभ्यासाचा जेवढा पाहिजे तेवढाच लोड होता. आताच्या या जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा ते दप्तराचं ओझं खूप
छान होतं….
मी व माझा भाऊ अगदी चौथी, पाचवीपासून काळाराम मंदिरात सायंकाळी 4-5 वाजता होणार्या हरिपाठाला जायचो.. सगळ्या आजींना पण छान वाटायचं.. उद्या ही गवळण पाठ करून या, असं म्हटलं की लगेच चाल लावून पाठ करायची आणि दुसर्या दिवशी म्हणून दाखवायची. सासूबाई, आत्याबाई या कृष्णाला सांगा काही, हरी माझ्या मंदिरी कधी तरी या.. वगैरे गवळण आज पण पाठ आहे. रात्री 8.30-9 च्या कीर्तनाला पण जायचं, कीर्तनाच्या पूर्वरंगामध्ये भाऊ छोटंसं भजन म्हणायचा..यामुळे अध्यात्माची, पाठांतराची, वाचनाची गोडी लागली. स्टेज डेअरिंग आलं. आज माझा भाऊ प्रवचकार, भजनी, भारुडकार म्हणून
ओळखला जातो.
Really!.. What happened that day….
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…
सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्यांचे…
नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…
गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…
आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…
सिन्नर-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर सुरू झालेली चर्चा थांबलेली…