प्रतिमा

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे नकळत ओले होतात.
परवा का कुणास ठाऊक पण मनाच्या एका कोपर्‍यात अलगद जपून ठेवलेले क्षण डोळ्यासमोरून फिल्मसारखे एक एक पुढे सरकत गेले… त्या आठवणींच्या सरीमध्ये मला चिंब भिजवत…
आजही या कडक उन्हात डोळे मिटले की, माझ्या चाळीतल्या त्या छोट्या घरासमोरच्या उंबराच्या झाडाचा गारवा मनाला नाही तर हृदयाला थंड करतो… शाळेतून दुपारी घरी आल्यावर मस्त तो ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही बघत दूध, पोहे खायला घ्यायचे आणि त्यात चुकून कोणाच्या केबलवरचा प्रोग्राम दिसला तर तो द्विगुणित झालेला आनंद या महागड्या मोठ्या कलर एलसीडीसमोर बसून चटकदार पदार्थ खाण्यातसुद्धा नाही.
गच्चीचा तो कोपरा नकळत कधी माझ्या रंगात रंगून गेला कळलंच नाही.. लहान असताना त्याच कोपर्‍यात भातुकली खेळायचे तेव्हा तो पण माझ्यासोबत लहान झाला… शाळेतला अभ्यास करताना माझ्यासोबत तोही अभ्यास करू लागला… आणि मोरपंखी स्वप्न बघताना जणू तोही माझ्यासोबत तरुण झाला.. शाळेतून येताना 1-2 रुपयाची आइस्क्रीम घ्यायची, नाही तर पेप्सी.. मस्त सीतागुंफावरून यात्रेकरूंची गंमत बघत खात खात यायचं पुढे काळारामाच्या मंदिरात. सभामंडपात थोडं खेळायचं, थोडा अभ्यास करायचा आणि माझा प्रिय सखा रामरायाच्या मूर्तीसमोर उभं राहून मनातल्या मनात त्याच्याशी खूप गप्पा मारायच्या. काही सण वगैरे असेल तर आदल्या दिवशी मी व माझा भाऊ, अजून बाकीची मुलं अशी आमची वानर सेना आदल्या रात्री जाऊन मंदिर झाडून घ्यायचो. सडा मारून सर्व मंदिरात रांगोळी काढायची… आता प्रत्येक सणाला शक्य होत नाही, पण जमेल तसं नक्की करतो.. पण आजही इतके वर्षे होऊनही रांगोळीची प्रत्येक रेघ ओढताना जुना बालपणीचा मातीचा तो सुगंध आसमंतात दरवळतो..अन् रामरायाच्या मूर्तीकडे बघितलं की, त्याच्याशी काहीपण बालिश गप्पा मारणारी मी मला त्याच्या डोळ्यात दिसते..
खरंच छान, सुंदर, अप्रतिम अनमोल.. हे शब्दसुद्धा कमी पडतील असं शब्दातीत बालपण होतं ते….सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मोबाइल नव्हता त्यामुळे मनोरंजनासाठी एक तर गोष्टीची पुस्तकं वाचायची, नाही तर बाहेर जाऊन आईचा ओरडा खायीपर्यंत खेळत बसायचं. लपाछपी, डोंगर का पाणी, तळ्यात-मळ्यात, गिलोरी, दोरीवरच्या उड्या, लंगडी पळी, पकडापकडी, मामाचं पत्र हरवलं…. असे अनेक खेळ. कमी जागा होती खेळायला तरी खेळत होतो.. आणि आज पोरांना बळजबरीने ग्राउंडवर खेळायला पाठवावं लागतं. उन्हाळ्यात तर गंगेवर जायचं म्हणून हट्टच करायची पोरं, कारण आमचा वॉटर पार्क म्हणजे आमची गोदामाई.. पाण्यात पाय सोडून पाण्याचा होणारा तो मऊ स्पर्श त्याच्या छोट्या छोट्या लहरींचा होणारा मधुर ध्वनी आणि अलगद गुदगुल्या करणार्‍या वार्‍याच्या झुळुकेसोबत भत्ता खाण्यात जी मज्जा व आनंद होता ना तो कितीही मोठ्या 5-7 स्टार हॉटेलमध्ये बसून ते कृत्रिम संगीत ऐकत अगदी स्वादिष्ट पदार्थ खाण्यात नाही.
वडील नेहमी म्हणतात काय दिवस होते ते आमचे..मला तेव्हा ते काय सारखं सारखं तेच सांगता असं वाटायचं.. पण आज जेव्हा माझे बालपणीचे ते दिवस, त्याचा तो पवित्र चैतन्यमय सुगंध मागे ठेवून कापरासारखे उडून गेले तेव्हा ते का सारखं असं म्हणतात याचा अर्थ उमगला.
हो मी त्या दिवसांना पवित्र चैतन्यमयच म्हणेल. कारण सायंकाळी घरात मंगलमय वातावरण होतं. दिवे लागणीला देवापुढे शुभं करोती म्हटली जायची..घरात संवाद होता.. आजीच्या गोष्टी होत्या.. अभ्यासाचा जेवढा पाहिजे तेवढाच लोड होता. आताच्या या जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा ते दप्तराचं ओझं खूप
छान होतं….
मी व माझा भाऊ अगदी चौथी, पाचवीपासून काळाराम मंदिरात सायंकाळी 4-5 वाजता होणार्‍या हरिपाठाला जायचो.. सगळ्या आजींना पण छान वाटायचं.. उद्या ही गवळण पाठ करून या, असं म्हटलं की लगेच चाल लावून पाठ करायची आणि दुसर्‍या दिवशी म्हणून दाखवायची. सासूबाई, आत्याबाई या कृष्णाला सांगा काही, हरी माझ्या मंदिरी कधी तरी या.. वगैरे गवळण आज पण पाठ आहे. रात्री 8.30-9 च्या कीर्तनाला पण जायचं, कीर्तनाच्या पूर्वरंगामध्ये भाऊ छोटंसं भजन म्हणायचा..यामुळे अध्यात्माची, पाठांतराची, वाचनाची गोडी लागली. स्टेज डेअरिंग आलं. आज माझा भाऊ प्रवचकार, भजनी, भारुडकार म्हणून
ओळखला जातो.

Really!.. What happened that day….

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago