रजस्वला परिचर्या – तुमच्या आरोग्यासाठी आयुर्वेदाची एक प्रेमळ साद
नुकताच 28 मे रोजी आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन पाळला. आजच्या धावपळीच्या जगात आपण स्त्रिया घरापासून ते ऑफिसपर्यंत सगळं काही अगदी लीलया सावरतो; पण या सगळ्यात आपण स्वतःकडे, स्वतःच्या शरीराकडे कुठेतरी थोडं दुर्लक्षच करतो, नाही का?
मासिक पाळीचे ते 3-4 दिवस म्हणजे निसर्गाने स्त्रीला दिलेली एक विश्रांतीची, स्वतःला जपण्याची सुंदर संधी असते. आपल्या आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वीच या दिवसांसाठी एक अतिशय शास्त्रशुद्ध आणि तितकीच प्रेमळ अशी जीवनशैली सांगितली आहे, जिला रजस्वला परिचर्या असं म्हणतात.
या नाजूक दिवसांत आपल्या शरीरात अनेक बदल वेगाने होत असतात. शरीराची शुद्धी होत असते आणि अपान वायू (खालच्या दिशेने जाणारा वायू) आपले काम करत असतो. या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही अडथळा येऊ नये आणि तुम्हाला या काळात कोणताही त्रास होऊ नये, हाच या रजस्वला परिचर्येचा मुख्य उद्देश आहे. यामुळे पाळीच्या काळात येणारा थकवा दूर होतो आणि भविष्यात पीसीओडी किंवा गर्भाशयाच्या इतर समस्यांपासून आपले छान
संरक्षण होते.
तुमचा आहार कसा असावा? (थोडं पथ्य, खूप सारं आरोग्य!)
या दिवसांत आपली पचनशक्ती थोडी नाजूक झालेली असते. त्यामुळे आपल्या पोटाला जड पडेल असं काहीही नको खायला.
आहार अगदी हलका, स्निग्ध आणि पचायला सोपा असावा. गरम आणि ताज्या जेवणात थोडं साजूक तूप नक्की घ्या. मुगाचे वरण, साळीच्या लाह्या, दूध असा सात्त्विक आहार घ्यावा. सतत तहान लागत असेल तर साधं पाणी पिण्यापेक्षा कोमट पाणी किंवा आयुर्वेदात सांगितलेले ‘षडंगानीय जल’ प्यावे, ज्याने शरीराला छान थंडावा आणि शांतता मिळेल.
बाहेरचे चमचमीत, अति तिखट, मसालेदार किंवा बेकरीचे पदार्थ या तीन-चार दिवसांसाठी तरी थोडे बाजूला ठेवूया! कारण ते पचायला खूप जड असतात आणि त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते.
स्वतःला द्या थोडी विश्रांती (विहार) म्हणजे मैत्रिणींनो, हे दिवस शरीराला आणि मनाला विश्रांती देण्याचे असतात. त्यामुळे या काळात अजिबात धावपळ करू नका. शरीराची स्वच्छता तर राखायचीच आहे; पण आंघोळीसाठी खूप थंड किंवा कडकडीत गरम पाणी न वापरता, छान कोमट पाण्याने आंघोळ करावी.
जड वजनाच्या वस्तू उचलणे, खूप प्रवास करणे किंवा जिममधला हेवी वर्कआउट या दिवसांत नक्की टाळा. दिवसा झोपणे आणि रात्री उशिरापर्यंत जागत बसणे यामुळे शरीरातील वात आणि कफ वाढू शकतो, त्यामुळे वेळेवर आणि शांत झोप घ्या.
मनाचीही घ्या काळजी…
पाळीच्या काळात हार्मोन्समुळे कधी कधी खूप चिडचिड होते, विनाकारण रडू येतं किंवा उदास वाटतं… हे अगदी स्वाभाविक आहे. अशा वेळी स्वतःला अजिबात दोष देऊ नका. स्वतःला थोडा वेळ द्या, छान शांत राहा. घरातील इतर मंडळींनीही या काळात आपल्या घरातील या माउलीला, लेकीला समजून घेत थोडा मानसिक आधार द्यायला हवा.
थोडक्यात आजच्या या ‘सुपरवूमन’च्या जमान्यात या सगळ्या नियमांचं तंतोतंत पालन करणं कदाचित कठीण वाटू शकतं. पण सख्यांनो, स्वतःसाठी थोडेसे बदल नक्की करून पाहा. शक्य तितका आराम करा आणि आहाराचे सोपे नियम पाळा. बघा, पाळीच्या वेळी होणार्या वेदना नक्कीच कमी होतील आणि एका सुंदर, निरोगी आयुष्याचा पाया रचला जाईल. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला जपा.
Menstrual care and Ayurveda
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…
सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…
इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…