सप्तशृंगगडावरील 22 किलो चांदी तफावतप्रकरणी चौकशीचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृृंगगडावरील मंदिरातील नक्षीकामातील सुमारे 22 किलो चांदी तफावत-अपहार प्रकरणाने खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांच्या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांनी संबंधित अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
दि. 25 मार्च 2026 रोजी ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाने सदर प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक तसेच विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे पाठवून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यास सांगितले आहे. अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी याबाबत लेखी आदेश जारी केले आहेत.
दुसरीकडे, जिल्हाधिकारी कार्यालयाने सहाय्यक जिल्हाधिकारी (कळवण), तहसीलदार कळवण तसेच ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
तक्रारीनुसार मंदिरातील नक्षीकामासाठी पूर्वीच्या नोंदीनुसार सुमारे 406 किलो चांदी वापरलेली असताना, प्रत्यक्ष मोजणीत केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी उपलब्ध आढळली. त्यामुळे 22 किलो 490 ग्रॅम चांदीची तफावत समोर आली आहे. अपहाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी चौकशी समितीसमोर दिलेल्या खुलाशात चांदी काढताना पंचनामा, वजन आणि सीलबंद प्रक्रिया नियमांनुसार झाली नसल्याचे नमूद केल्याने संशय अधिक गडद झाला आहे. प्रथम अपील दाखल करूनही कार्यवाही न झाल्याने राज्य माहिती आयोग, नाशिक खंडपीठाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आंदोलनानंतर प्रकरणाला वाचा
फुटल्यानंतर द्यानद्यान व विधिज्ञ सुरेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव व माजी सरपंच बेबीबाई जाधव यांनी जानेवारी 2026 पासून आंदोलन सुरू केले होते. त्यानंतरच हे प्रकरण सार्वजनिक पातळीवर
चर्चेत आले.
तक्रारीत ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त व संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अपहारित चांदीची रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सप्तशृंंगीदेवी हे राज्यातील प्रमुख शक्तिपीठ असल्याने या प्रकरणाकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. चौकशीचा अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भाविकांचा विश्वास अबाधित राहावा, हीच अपेक्षा आहेे.
– विठोबा द्यानद्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *