स्पर्धा परीक्षेची तयारी करणे म्हणजे आपण शिकलेल्या सर्व वर्गांच्या अभ्यासाला पुन्हा उजळणी देणे होय, आपण अंकगणित, मराठी, इंग्रजी अशा विषयांची तयारी शालेय अभ्यासात केलेली असते. त्याच अभ्यासाचे उपयोजन आपल्या कौशल्यानुसार स्पर्धा परीक्षेत केले जाते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पूर्ण यश मिळेपर्यंत तयारी करायला हवी.
स्पर्धा जास्त असल्याने आपला स्वतःवरील आत्मविश्वास खचू न देता, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खडतर परिश्रम घेणे गरजेचे असते. जास्त वेळ अभ्यास करणे म्हणजे खूप तयारी होते असे नाही. किती कमी वेळात नवीन संकल्पना आत्मसात करता येतात त्याकडे जास्त भर द्यायला हवा. अंकगणिताच्या क्रिया झटपट करता येण्यासाठी चांगला सराव हवा. या सर्व विषयांची तयारी करण्यासाठी एखादा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्स केल्यावर निश्चित अभ्यासाची दिशा स्पष्ट होते. अनेक विद्यार्थी अनेक स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. ते त्यांच्या मेहनतीच्या बळावर. स्पर्धा परीक्षेचा प्रवास करताना थकवा, आळस दूर करून निरंतर अभ्यास करून यशाला गवसणी घालता येते. 10 वी, 12 वीपर्यंतच्या सर्व शालेय पाठपुस्तके सुरुवातीला वाचन करून मुख्य संकल्पना स्पष्ट करून नंतर स्वतंत्र विषयाची नामांकित लेखकांची दर्जेदार पुस्तके अभ्यासावी. चालू घडामोडीकरिता पेपर वाचन तसेच बातम्या बघणे गरजेचे आहेत. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांचा अनुभव आपल्या अडचणी दूर करणारा असतो. अपयशाला न खचता निरंतर अभ्यासात सातत्य गरजेचे आहे. अभ्यास हा उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून करावा, परीक्षेत येणारे प्रश्न, त्यांचे स्वरूप, प्रश्नांची काठिण्यपातळी लक्षात घेऊन त्याअनुषंगाने अभ्यासाला विषयानुरूप महत्त्व देण्यात यावे व त्या पद्धतीने अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे व हितचिंतकाचे स्वप्न साकार करावे.
– संतोष मढवई
संचालक, नवचेतना अकॅडमी, येवला