नाशिक

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांवरील अन्यायाविरुद्ध निदर्शने

प्रांत पवन दत्तांचे निलंबन करा, जमिनी देण्यास विरोध कायम

नाशिक : प्रतिनिधी
मुंगसरा-मातोरी येथे दि. 2 मे रोजी घडलेली शेतकर्‍यांवरील अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक असून, संपूर्ण जिल्ह्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकरी महिला व शेतकर्‍यांवर झालेल्या अमानुष वागणुकीचा सर्व शेतकरी संघटना व शेतकर्‍यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (दि. 4) निदर्शने करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. प्रांताधिकारी पवन दत्ता यांना तत्काळ अटक करून निलंबित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व निवासी उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्या उपस्थितीत छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व विविध सामाजिक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत पवन दत्ता यांच्यावरील कारवाईसंदर्भात पाच दिवसांत शासनाला अहवाल पाठवून निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रस्तावित बाह्य रिंगरोडसंदर्भात जिल्हाधिकारी स्वतः शेतकर्‍यांच्या जमिनींची पाहणी करून अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर मंत्री महाजन स्वतः सर्वेक्षण करून तोडगा काढतील, असे निश्चित करण्यात आले.
यावेळी पर्यायी गवळवाडी मार्गाचाही विचार करण्याचे आदेश देण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारची जमीन मोजणी किंवा अधिग्रहणाची कार्यवाही करण्यात येणार नाही,तसेच शेतकर्‍यांची संमती घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असा शब्द शिष्टमंडळाला देण्यात आला.
या आंदोलनात राजू देसले, करण गायकर, नानासाहेब बच्छाव आशिष हिर, हरिभाऊ बोडके, कैलास खांडबहाले, साहेबराव दातीर, मनोज पालखेडे, नवनाथ शिंदे, अनिल थेटे, संगीताताई सूर्यवंशी, योगेश गांगुर्डे, नाना पालखेडे, प्रफुल्ल वाघ, शेतकरी नेते अर्जुन बोराडे, भास्कर उगले, शेतकरी कोकणे पाटील, सविता वाघ, भारत पिंगळे यांसह मातोरी-मुंगसरा, नाशिक पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिष्टमंडळाशी चर्चा करताना ना. गिरीश महाजन व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेली आश्वासने तत्काळ पूर्ण करावीत. प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्यावर पाच दिवसांत निलंबनाची कारवाई करून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात यावी. अन्यथा आम्ही पुन्हा एकदा सर्व शेतकर्‍यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे जनआंदोलन उभारू. शेतकर्‍यांच्या अस्मितेशी खेळ करण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही.
– करण गायकर, संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना

शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाकडून ज्या पद्धतीने प्रांत पवन दत्ता यांच्याबद्दल माहिती मिळाली, तसेच ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या सर्व गोष्टींची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना देऊन तत्काळ प्रांताधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. शेतकर्‍यांवर दंडुकेशाही, हुकूमशाही कुठल्याही अधिकार्‍याने करू नये, असे स्पष्ट निर्देश शासनाच्या वतीने दिलेले असताना, हा जो काही प्रकार घडला तो नक्कीच निषेधार्ह आहे. संबंधित अधिकार्‍याची तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू.
– गिरीश महाजन, कुंभमेळामंत्री

Protests against injustice against farmers affected by the ring road

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

12 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

31 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

38 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

47 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

55 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago