पर्यावरण, आरोग्यावर गंभीर परिणाम; जलप्रदूषण रोखणे आवश्यक
निफाड : विशेष प्रतिनिधी
नदी, नाले व तलावांमध्ये जलपर्णी या आक्रमक वनस्पतीचा वाढता विळखा पर्यावरणासाठी गंभीर धोक्याचे रूप धारण करत आहे. पाण्यावर दाट थर निर्माण करणारी ही वनस्पती सूर्यप्रकाश व ऑक्सिजनचा पुरवठा रोखत असल्याने मासे व इतर जलचरांच्या अस्तित्वावरच संकट निर्माण होत आहे. परिणामी जलस्रोतांचा नैसर्गिक समतोल बिघडत असून, जलप्रदूषणात मोठी भर पडत आहे.
जलपर्णीच्या पानांच्या देठात असलेल्या हवेच्या पोकळ्यांमुळे ती पाण्यावर सहज तरंगते. तिची मुळे पाण्याखाली पसरत असली तरी फुगीर रचनेमुळे ती जलस्रोतांवर जलदगतीने विस्तारते. सांडपाणी, रासायनिक खतांचा अतिरेक व औद्योगिक सांडपाण्यातील पोषक घटकांमुळे जलपर्णीची वाढ अधिक वेगाने होते. ही वनस्पती कुजल्यावर पाण्यात दुर्गंधी निर्माण होते व प्रदूषणाचे प्रमाण आणखी वाढते. जलपर्णी रोखण्यासाठी सर्वप्रथम जलप्रदूषणावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचर्याचे वर्गीकरण, नदी स्वच्छता, वृक्षारोपण, रासायनिक खते व कीटकनाशकांचा मर्यादित वापर, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारणे आणि औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात.
निर्माल्य नदीत न टाकता त्यापासून खतनिर्मिती करणे व पर्यावरणपूरक स्वच्छता उत्पादने वापरणे यालाही प्राधान्य देणे गरजेचे आहे. जलपर्णीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जैविक पद्धतींचाही वापर महत्त्वाचा ठरत आहे. जलपर्णीवर उपजीविका करणारे विशिष्ट कीटक व बुरशी यांच्या साहाय्याने तिची वाढ नैसर्गिकरित्या आटोक्यात आणता येते. तसेच औद्योगिक सांडपाण्यातील पारा, शिसे यांसारख्या जड धातूंचे थेट विसर्जन टाळून त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. नायट्रोजन व फॉस्फरस या पोषक घटकांचे प्रमाण कमी ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रदूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड, कावीळ, अतिसार, गॅस्ट्रोएन्टेरायटिस यांसारखे आजार वाढत आहेत. तसेच दूषित पाण्यात वाढणार्या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया व मेंदूज्वर यांचा धोका वाढतो. त्यामुळे जलप्रदूषण हा केवळ पर्यावरणीय नव्हे, तर सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे
Water lilies infest rivers and lakes
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…