पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर पोलिसांनी राबविल्यामुळे गुन्हेगारांवर काही प्रमाणात जरब निर्माण झाली आहे. पण रिक्षाचालकांकडे पोलिसांनी काहीसे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या काही महिन्यांत रिक्षाचालकांची मुजोरी चांगलीच वाढली आहे. रिक्षाचालकांमुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या आणखी बिकट बनली आहे.
शहरात सध्या मोठ्या प्रमाणात खोदकामे सुरू आहेत. या खोदकामांमुळे आधीच एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असताना रिक्षाचालक फ्रंटसीटवर प्रवासी बसवून सुसाट रस्त्यावरून धावत असतात. त्यात पुढे जाण्याच्या घाईत रिक्षा आडवीतिडवी चालवतात. स्वत: वाहनांचे नियम पायदळी तुडवत इतर वाहनधारकांवरच अरेरावी करण्याचे प्रकार घडत आहेत.
मध्यतंरी शहर पोलिस आयुक्तालयाने या रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. मात्र, नव्याचे नऊ दिवस सरताच ही मोहीम बासनात गुंडाळून ठेवली. रिक्षाचालकांना गणवेश, बिल्ला सक्तीचे केले होते. आता पुन्हा रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी कायद्याचा दंडुका उगारण्याची गरज निर्माण झाली आहे. गंगापूररोड, शिवाजीनगर या मार्गावर तर सर्रास फ्रंटसीट रिक्षाचालक दिसतात. याशिवाय अशोक स्तंभ भागात भररस्त्यात रिक्षा उभ्या राहतात. त्यातून रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय इतर वाहनांना कट मारणे, नो एन्ट्रीमध्ये सर्रास रिक्षा दामटणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. रिक्षाचालकांच्या या उद्दामपणाला पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला दाखविणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
वाहतूक पोलिस गायब
शहरातील सिग्नलवरील वाहतूक पोलिस सध्या गायब झालेले आहेत. ट्रॉफिक वॉर्डन नियुक्त केले आहेत. मात्र, या ट्रॉफिक वॉर्डनला रिक्षाचालक जराही दाद देत नाहीत.त्यामुळे पोलिस आयुक्तालयाने रिक्षाचालकांविरोधात तातडीने मोहीम हाती घेऊन शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात वाहतुकीच्या कोंडीत भर घालण्यात रिक्षाचालकांचीच भूमिका मोठी असल्याचे मत मध्यंतरी पोलिस विभागाने व्यक्त केले होते. त्यानंतर मोहीम हाती घेतल्यानंतर काहीसा धाक निर्माण झाला होता. मात्र, आता पुन्हा रिक्षाचालकांची मुजोरी वाढल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळतेे.
Rickshaw drivers’ struggle in the citadel of law