कसबे सुकेणे : प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील संतोष जयवंत भंडारे यांचा इयत्ता दहावी शिकत असलेला मुलगा तन्मय भंडारे (वय 15) याचा घराजवळच असलेल्या शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी (दि. 24) सकाळी नऊ वाजता क्लासवरून आल्यानंतर दहा वाजेच्या सुमारास नाश्ता करून शेततळ्यात पाणी किती आहे, हे पाहण्यासाठी गेला असता पाय घसरून शेततळ्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. रविवारची सुट्टी असल्याने कदाचित तो मित्रांकडे गेला असेल असा घरच्यांचा अंदाज होता. मात्र, रात्री आठ वाजल्यानंतरही तो न आल्याने घरच्यांनी चौकशी केली. पण तो कुठेही आढळला नाही. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास त्याच्या वडिलांनी शेजारच्या शेततळ्यात डोकावले असता, त्यांना तन्मयचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. पिंपळगाव बसवंत येथे शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आजोबा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस तपास करत आहेत.