रामकाल पथला अडचण ठरणारे वाडे हटवणार

अधिकार्‍यांची रामकुंड परिसरात पाहणी

नाशिक : प्रतिनिधी
केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी असलेला रामकाल पथ प्रकल्प पूर्णत्वासाठी महापालिका प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. दोन टप्प्यांत शंभर कोटींची निविदा काढून कामांची यादी तयार करण्यात आली आहे. दरम्यान, रामकुंड ते श्री काळाराम मंदिरापर्यंत रामकाल पथचा विस्तार असणार आहे. पण यादरम्यान काही वाडे रामकाल पथ प्रकल्पास अडथळे ठरत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून काही वाडे हटवले जाण्याची शक्यता आहे.
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रामकाल पथसाठी नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अडथळा ठरणारी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे याशिवाय इतर कोणत्या अडचणी आहेत का? याबाबतची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार यांनी केली. सिंहस्थापूर्वी रामकाल पथ मार्गी लावणासाठी मनपा प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. श्री काळाराम मंदिर, रामकुंडासह सीतागुंफा परिसराची अधिकार्‍यांनी माहिती घेत अडचणी जाणून घेतल्या. काही दिवसांपूर्वी आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकाल पथसाठीची कामे लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले होते. महापालिका सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी रामकुंड ते काळाराम मंदिर परिसरात रामकाल पथ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने महापालिकेला शंभर कोटी निधी दिला आहे. त्यानुसार रामायणाची थीम वापरून येथील परिसराचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करून आध्यात्मिक कॉरिडॉर तयार केला जाईल. त्यासाठी या संपूर्ण परिसराचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण पूर्ण गोदाघाट व मंदिर परिसर, अनेक जुने वाडे, इमारती, छोटी- मोठी मंदिरे यांचे सर्वेक्षण करण्यात आले. रामकाल पथ प्रकल्पांतर्गत येथे रामायणावर आधारित शिल्प उभारले जाणार आहे. त्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कॉरिडॉर साकारल्या जाणार्‍या परिसराचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. ते पूर्ण झाले असून, या प्रकल्पावर काम करताना त्याचे तीन ते चार टप्पे करण्यात आले आहेत. त्याबाबतही अधिकार्‍यांनी माहिती घेतली आहे.

राज्य शासनाकडून 46 कोटी नाहीच

केंद्र शासनाने रामकाल पथ प्रकल्पासाठी 99 कोटी रुपये मंजूर करताच महापालिकेने कामे सुरू केली आहेत. मात्र, राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने 46 कोटी द्यावे याकरिता दोनदा पत्रे पाठवूनही शासनाने महापालिकेला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. त्यामुळे उर्वरित निधी मिळ्वणार कसा, या पेचात महापालिकेचे अधिकारी आहेत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *