देवळा ( प्रतिनिधी ) : कांद्याला कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. साधा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने उसनवारीने घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करायची या विवंचनेत असलेल्या खुंटेवाडी ता.देवळा येथील महेंद्र सुरेश भामरे (वय ४२) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील महेंद्र सुरेश भामरे उर्फ गोटू या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन केल्याने त्याचा रविवार (ता.१) रोजी मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी वर्गात व्यवस्थेविरुद्ध संतापाची लाट उसळली असून या शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची मदत मिळावी अशी मागणी होत आहे. कष्ट केलेल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही वसूल होत नसेल तर मग शेतकऱ्याने कसे जगावे असा प्रश्न विचारला जात आहे.
महेंद्रने मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा शुक्रवार (ता.२९) रोजी बाजारात विक्रीसाठी नेला. परंतु या चांगल्या दर्जाच्या कांद्याला केवळ आठ रु.प्रतिकिलो भाव मिळाला. ३० क्विंटल ट्रॅक्टरभर कांद्याचे केवळ २४ हजार रु.झाले. त्यात ट्रॅक्टरभाडे, मजुरी व इतर खर्च यामुळे हातात प्रत्यक्ष कमीच रक्कम राहिली. यामुळे घरबांधणीसाठी घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करायची, घरखर्च कसा भागवायचा असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने चिडचिड होत महेंद्रने त्याच दिवशी घरात असलेली कीटकनाशके पिऊन घेतली. हे लक्षात येताच तातडीने त्यास देवळा ग्रामीण रुग्णालय मग मालेगाव आणि नंतर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार चालू केले. पण त्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने रविवार (ता.१) रोजी त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चयात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
प्रतिक़िया
“महेंद्र हा अत्यंत कष्टाळू युवा शेतकरी होता. मोठ्या कष्टाने छोटेसे घर बांधत त्याने संसार उभा केला. या कुटुंबाला मदत मिळण्याची गरज आहे.”
-भाऊसाहेब पगार, माजी सरपंच खुंटेवाडी, ता.देवळा
“अवकाळी पाऊस, करपा रोगाचा प्रादुर्भाव, खंडीत वीजपुरवठा, अंतिम टप्प्यात पाण्याचा तुटवडा यामुळे कांद्याच्या उत्पादनात ३५ ते ४० टक्के घट झालेली आहे. आणि त्यात ७०० ते १००० रु.प्रति क्विंटल भाव शेतकऱ्यांना अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे साधा उत्पादन खर्चही मिळत नसल्याने कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे तर शेतकरी आत्महत्या करून कुटुंबाला दुःखाच्या खाईत लोटत आहे.”
-जयदीप भदाणे, जिल्हाध्यक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटना
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…