उत्तर महाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग; नाशिकमध्ये आजपासून नवीन दर लागू

पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग; नाशिकमध्ये आजपासून नवीन दर लागू
नाशिक:  प्रतिनिधी
देशभरातील तेल कंपन्यांनी मंगळवार (१९ मे) पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ केली असून, त्याचा परिणाम नाशिक शहरातही दिसून आला आहे. नव्या दरांनुसार नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०८.८४ रुपये, तर डिझेलचा दर ९५.३५ रुपये इतका झाला आहे. कंपनी आणि पेट्रोल पंपाच्या स्थानानुसार या दरांमध्ये सुमारे १० ते १५ पैशांचा फरक असू शकतो.
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात सरासरी ९० पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वी म्हणजेच १५ मे रोजी तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात सुमारे ३ रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा झालेल्या या दरवाढीमुळे वाहनचालकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
इंधन दरवाढीचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित न राहता वाहतूक खर्चावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीपाला, मालवाहतूक तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेले चढ-उतार, डॉलरच्या तुलनेत रुपयावरील दबाव आणि वाढलेला आर्थिक ताण यामुळे दर समायोजन करण्यात आल्याचे तेल कंपन्यांकडून सांगितले जात आहे. देशातील प्रमुख शहरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून, एका आठवड्यातील ही दुसरी दरवाढ ठरली आहे.
नाशिकमधील आजचे इंधन दर (१९ मेपासून लागू)
• पेट्रोल : १०८.८४ रुपये प्रति लिटर
• डिझेल : ९५.३५ रुपये प्रति लिटर
(कंपनी व पेट्रोल पंपाच्या स्थानानुसार दरात किंचित फरक असू शकतो.)

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

View Comments

  • इंधन दरवाढ ही आता देशातील सामान्य माणसाच्या आयुष्याचा जणू कायमस्वरूपी भाग बनत चालली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की, त्याचा परिणाम केवळ वाहन चालवणाऱ्यांवर होत नाही,तर संपूर्ण अर्थचक्रावर त्याचे पडसाद उमटतात. आज नाशिकमध्ये पेट्रोल १०८ रुपयांच्या पुढे आणि डिझेल ९५ रुपयांच्या पुढे गेल्याची बातमी ही केवळ आकड्यांची वाढ नाही, तर वाढत्या आर्थिक ताणाची जाणीव करून देणारी बाब आहे.
    विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांत पुन्हा झालेली ही दरवाढ सामान्य नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी आहे. आधीच महागाई, घरखर्च, शिक्षण, आरोग्य, वीजबिल, कर्जाचे हप्ते अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गासाठी इंधन दरवाढ म्हणजे आणखी एक आर्थिक धक्का ठरतो.
    पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होतो. वाहतूक खर्च वाढला की भाजीपाला, धान्य, दूध, बांधकाम साहित्य, किराणा माल अशा जवळपास प्रत्येक वस्तूची किंमत हळूहळू वाढू लागते. त्यामुळे “इंधन महागले” ही केवळ वाहनधारकांची समस्या राहत नाही, तर ती सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी जोडली जाते.
    जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, आंतरराष्ट्रीय तणाव अशा कारणांचा उल्लेख तेल कंपन्या करतात; पण सामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न कायम राहतो “दर वाढतात तेव्हा इतक्या वेगाने वाढतात, मग कमी होताना त्याच वेगाने का कमी होत नाहीत?” या सर्वसामान्य माणसांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर सरकारकडे नाही.
    आज देशात लाखो युवक रोजगारासाठी रोज प्रवास करतात. शेतकरी शेतीमाल बाजारात नेतो. छोटा व्यापारी माल पोहोचवतो. रिक्षाचालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यांचे संपूर्ण अर्थकारण इंधनावर उभे आहे. त्यामुळे दरवाढ ही केवळ आर्थिक विषय नसून सामाजिक प्रश्नही बनत चालली आहे.
    सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी दीर्घकालीन उपाययोजनांचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. कररचना, पर्यायी ऊर्जा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ठोस धोरणे आवश्यक आहेत. अन्यथा प्रत्येक काही दिवसांनी होणारी दरवाढ सामान्य माणसाच्या सहनशक्तीची परीक्षा घेत राहील.
    आज परिस्थिती अशी झाली आहे की, पेट्रोल पंपावर वाहन थांबवताना लोक आधी मीटरकडे नव्हे, तर आपल्या खिशाकडे पाहू लागले आहेत. हीच खरी चिंतेची बाब आहे.

Recent Posts

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

4 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

20 minutes ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

22 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

22 hours ago

समाजाची अधोगती…

गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…

22 hours ago

मनमाड एसटी आगारात प्रवाशाची अडवणूक

सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…

22 hours ago