नदीच्या ऐलतीरावरून पैलतीरावर जर जायचं असेल तर आपल्याला तिचं ते भलंमोठं पात्र तर पार करावंच लागतं. त्याशिवाय आपल्याला पैलतीर गाठता येत नाही. अशात मग काही संकटेही येतात. कधी प्रवाहाचा वेग वाढून अडथळा येतो तर कधी प्रवाहासोबत येणारे त्रासदायक जीव त्रास देतात. कधी कचरा आला तर तो बाजूला सारावा लागतो. अन् मग पुढं जावं लागतं तो पैलतीर गाठायला.
अगदी तसंच काहीसं आपल्या आयुष्याचंही असतं ना!. आयुष्याचा ऐलतीर हा सुंदर अशा त्या बालपणीच्या कोवळ्या लुसलुशीत दाट हिरवळीने आच्छादलेला असतो. अगदी सुखद असाच तर पैलतीर म्हणजे उतारवय, वृद्धत्व आणि या दोन्ही तीरांच्या मधली जागा म्हणजे जीवनाच्या नदीचे तारुण्याचे विस्तीर्ण असे पात्र, जबाबदारी पेलण्याचा हा काळ असतो आणि त्या जबाबदार्या पेलताना आणि स्वतःला सिद्ध करताना त्या पैलतीरी जाण्याच्या काळात मात्र कैक अडथळेही पार करावे लागतात. कधीकधी सुखाच्या लहरीसोबत दुःखाच्या लहरीही येतात आणि त्यात मध्येच त्यांच्या प्रवाहाचाही वेग कधी तरी अचानक वाढतो. आणि त्याही मग सहन करून हातपाय मारून पुढं चालावं लागतं अन् तारुण्याचं ते पात्र शिताफीने पार करावं लागतं. ऐलतीरावरून तारुण्याच्या पात्रात स्वप्नं उराशी बाळगून उतरताना तर खूप छान वाटतं खरं पण जेव्हा कर्तव्य, जबाबदारी, स्वप्नपूर्ती यांच्या खाली आपण दबून जातो तेव्हा मात्र वाटतं की, खरंच तो ऐलतीर किती छान होता ना!
अन् मग पैलतीरावर गेलं तरी ऐलतीरी आपसूक वळून वळून पाहिलं जातं आणि मन मात्र सतत ऐलतीरीच त्या बालपणात मुक्तपणे रेंगाळत असतं. कारण पैलतीराच्या पुढली काही कल्पनाच आपण करू शकत नाही. त्यामुळे तेव्हा ऐलतीर आठवून रमल्याशिवाय पर्याय आपल्याला नसतो. खरं तर जिथून खर्या अर्थाने आपलं आयुष्य सुरू होतं आणि घडत असतं तो काळ खूप महत्त्वाचा असतो आणि मग बरेचदा तसंच काहीसं बालपणासारखं अल्लड वागलंही जातं. म्हणतात ना, वृद्धत्व म्हणजे दुसरं बालपणच अगदी तसंच काहीसं. आपल्याला कितीही वाटलं की, ऐलतीरीच थांबावं तरी ते नाही शक्य होत ना! कारण तसा निसर्ग नियमच आहे. आयुष्यात बालपणाच्या ऐलतीरावरून तारुण्याच्या पात्रात आणि मग उतारवयाचा तो पैलतीर तर आपल्याला गाठावाच लागतो. अन् मग शेवटी ऐलतीराच्या त्या प्रेमळ, आल्हाद आणि तनमनाला असीम असा गारवा देणार्या त्या सुखद अशा आठवणींच्या सिंचनाने तो पैलतीरही मग हिरवळ करण्याचा नक्कीच प्रयत्न होतो…
-वंदना गांगुर्डे
सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…
नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…
पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…
आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…
रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…
संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…