नाशिक

बिबट्याने वर्षभरात 6 बळी घेऊनही वन विभाग सुस्त

ग्रामस्थांचा संताप; बिबट्याच्या संख्येत झपाट्याने वाढ

दिंडोरी : अशोक केंग
तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी नागरिक दहशतीखाली असतानाच, वन विभागाच्या आकडेवारीने एक धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. गेल्या वर्षभरात बिबट्याच्या हल्ल्यात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. इतकी मोठी जीवितहानी होऊनही वन विभाग ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
केवळ मानवी जीवच नाही, तर शेतकर्‍यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या पशुधनावरही बिबट्याने ताव मारला आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, एका वर्षात तब्बल 309 पाळीव प्राण्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, वन विभागाकडून मिळणारी मदत तुटपुंजी आणि उशिरा मिळत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. तालुक्यात बिबट्याचा वावर इतक्या मोठ्या प्रमाणावर असताना, संपूर्ण क्षेत्रात केवळ 42 पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्यांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या भागात हल्ले झाले आहेत, तिथे तत्काळ पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करणे आवश्यक असताना, वन विभाग केवळ आश्वासनांचे गाजर दाखवत असल्याची भावना जनसामान्यांत निर्माण झाली आहे.
इतके मृत्यू होऊनही वन विभाग डेंजर झोन घोषित करून गस्त का वाढवत नाही? नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर का केला जात नाही? बळी गेलेल्यांच्या कुटुंबांना आणि पशुधन गमावलेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत का मिळत नाही?
अनेक गावांमध्ये दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने शेतमजुरांनी शेतात जाणे बंद केले आहे, ज्याचा परिणाम शेतीकामावर होत आहे. जर वन विभागाने पुढील काही दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त केला नाही, तर वन कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिंडोरीतील संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

वन विभाग दिंडोरीचे वनपरिक्षेत्र
अधिकारी सुशांत पाटील यांना विचारणा

प्रश्न : डेंजर झोन घोषित करून गस्त वाढवण्यास मुहूर्त कधी
मिळणार?
उत्तर : ज्या गावांमध्ये बिबट्याचे सतत हल्ले होत आहेत, त्या ठिकाणी गस्त वाढवली आहे. वनविभागाचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. अतिसंवेदनशील ही संकल्पना अस्तित्वात नाही.
प्रश्न : 42 पिंजर्‍यांचा फार्स कशासाठी? अत्याधुनिक तंत्रज्ञान कुचकामी का?
उत्तर : बिबट्या पकडणे याला एकमेव मार्ग म्हणजे पिंजर्‍याचा आहे. रेस्क्यू टीममार्फत थर्मल कॅमेरे, नाईट व्हिजन ड्रोन आणि ट्रॅकिंग चिप्स यांसारख्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जातो.
प्रश्न : नुकसानभरपाईचा खेळ कधी थांबणार?
उत्तर : दिंडोरी वनविभागाच्या कार्यालयात प्रकरण दाखल झाल्यास नुकसानभरपाईचे प्रकरण दाखल झाल्यास त्यास त्वरित भरपाई मिळवून देण्यासाठी अहवाल सादर केला जातो. वीस दिवस ते एक महिन्याच्या आत भरपाई देण्यात आलेली आहे.

आम्ही शेतामध्ये व वस्तीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, त्यांमध्ये दर दोन ते तीन दिवसाला बिबट्या कैद होतो. वन विभागाला कळवूनही उपाययोजना राबविल्या जात नाहीत. आजपर्यंत आमच्या वस्तीवरील पाळीव प्राण्यांवर बिबट्याने अनेकदा हल्ले केले, मात्र वन विभाग दखल घेत नाही.
– डॉ. प्रशांत पिंगळ, अवनखेड

बिबट्याच्या दहशतीमुळे आम्ही जीव मुठीत धरून जगायचे का? राज्य शासनाला जाग येण्यासाठी अजून किती बळी हवेत? आमची मुलेही शाळेत जाण्यासाठी घाबरतात. दिंडोरी तालुक्यात दर महिन्याला बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी.
-विनायक शिंदे, सरपंच, वलखेड

Forest department remains inactive despite leopard killing 6 people in a year

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डाळिंबबागेने नेसला ‘पांढरा शालू’

सिन्नर : प्रतिनिधी एप्रिल महिन्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने सिन्नर तालुक्यातील तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले…

17 minutes ago

शासकीय जमिनीवरील घरे होणार अधिकृत

निफाड उपविभागीय अधिकार्‍यांचे नगरपालिकांना आदेश सिन्नर : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, सिन्नर आणि…

20 minutes ago

आदिवासी भागातील डोंगरदर्‍यांत बहरताहेत करवंदे

इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरदर्‍या परिसरातील आदिवासी भागातील “डोंगरची…

28 minutes ago

दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेचे लैंगिक शोषण

भोंदूबाबावर गुन्हा दाखल निफाड /लासलगाव : वार्ताहर घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा…

1 hour ago

पंचायत राज : तळागाळातील लोकशाहीचा पाया

भारतीय संस्कृतीच्या पायाभूत रचनेत ‘ग्राम’ ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. प्राचीन काळापासून गाव हे सामाजिक, आर्थिक…

1 hour ago

जबाबदारीने बोला!

राजकीय नेत्यांनी जबाबदारीने आणि सभ्यतेने बोलावे, त्यांनी सभ्य भाषा वापरावी, घटनात्मक पदांची मानमर्यादा राखावी, अशा…

2 hours ago