तरुण

‘ते’उनाड दिवस…

– काव्या देसाई

आयुष्यात प्रत्येक टप्प्याला स्वतःचं एक वेगळं स्थान असतं. बालपण निरागस असतं, तारुण्य स्वप्नांनी भरलेलं असतं आणि या दोघांना जोडणारा सर्वांत सुंदर टप्पा म्हणजे कॉलेजचं आयुष्य. काळ पुढे सरकत राहतो, जबाबदार्‍या वाढत जातात, माणसं बदलतात, पण कॉलेजच्या आठवणी मात्र काळाच्या ओघातही ताज्याच राहतात.

कॉलेजमध्ये शिकलेले विषय, दिलेल्या परीक्षा आणि मिळालेले गुण यापेक्षा जास्त आठवणीत राहतात ते मित्र, मैत्रिणी आणि त्यांच्यासोबत घालवलेले बेफिकीर क्षण. वर्गात बसून व्याख्यान ऐकण्यापेक्षा कधी कधी लेक्चर बंक करून कॅन्टीनमध्ये किंवा कॉलेजच्या कट्ट्यावर तासन्तास मारलेल्या गप्पांमध्येच खरी मजा असायची. त्या गप्पांना कोणताही ठोस विषय नसायचा. कधी भविष्याची स्वप्नं, कधी एखाद्या प्राध्यापकाची नक्कल, कधी मित्रांची खेचाखेच, तर कधी अगदीच अर्थहीन चर्चा पण त्या प्रत्येक क्षणात एक वेगळाच आनंद दडलेला असायचा.
त्यावेळी वेळेची घाई नव्हती, जबाबदार्‍यांचे ओझे नव्हते आणि उद्याची फारशी चिंता नव्हती. मित्रांसोबतचा प्रत्येक दिवस हा एक छोटासा उत्सवच वाटायचा. एखाद्या मित्राकडे पैसे नसले तरी एकाच चहाचे अनेक घोट घेत गप्पा रंगायच्या. कॅन्टीनमधील चहा, समोसा, कट्टा, वार्षिक स्नेहसंमेलन, सहली, प्रोजेक्टची धावपळ, शेवटच्या क्षणी केलेला अभ्यास आणि परीक्षा संपल्यानंतरचा जल्लोष – हे सगळं आजही मनाच्या एका कोपर्‍यात जिवंत आहे.
आज आयुष्य स्थिर झालं आहे. नोकरी, व्यवसाय, संसार, कुटुंब आणि असंख्य जबाबदार्‍या यांच्यात दिवस कसा संपतो तेही कळत नाही. मित्रांची भेट क्वचितच होते. मोबाईलवरचे संदेश आणि सोशल मीडियावरील शुभेच्छा एवढाच संवाद उरला आहे. भेट झाली तरी प्रत्येकाकडे वेळ कमी असतो. तेव्हा नकळत कॉलेजचे दिवस आठवतात आणि मन पुन्हा त्या जुन्या कट्ट्यावर जाऊन बसतं.
कॉलेजने केवळ शिक्षण दिलं नाही, तर जगण्याची कला शिकवली. मैत्रीचा अर्थ समजावून सांगितला, अपयश पचवायला शिकवलं, आत्मविश्वास दिला आणि आयुष्यभरासाठी असंख्य आठवणी दिल्या. त्या आठवणींना किंमत नसते, कारण त्या पैशाने विकत मिळत नाहीत. त्या फक्त जगता येतात आणि आयुष्यभर जपता येतात.
खरंच, कॉलेजचे ते उनाड दिवस पुन्हा कधीच परत येणार नाहीत. पण त्यांची आठवण मात्र प्रत्येक वेळी चेहर्‍यावर हसू आणि डोळ्यांत नकळत पाणी आणते. आयुष्य कितीही पुढे गेले तरी मनाचा एक कोपरा कायम त्या कट्ट्यावर, त्या मित्रांमध्ये आणि त्या बेफिकीर दिवसांमध्येच रमलेला असतो. म्हणूनच म्हणावंसं वाटतं-कॉलेज संपतं, पण कॉलेजच्या आठवणी कधीच संपत नाहीत.

Those Carefree Days…

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

16 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

16 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

16 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

17 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

17 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

17 hours ago