महाराष्ट्र

काळ्याकुट्ट अंधारात आदिवासींचा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष

काळ्याकुट्ट अंधारात आदिवासींचा

पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष

सुरगाणा : नासिर मणियार

आदिवासी भागातील पाझर स्रोत आटले, आणि इकडे सरकारलाही पाझर फुटेना अशा पाणी टंचाईच्या भीषण संकटात सापडलेला आदिवासी समाज कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी दाही दिशा पायपीट करीत आहे पाण्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेणारा उर्वरित महाराष्ट्र जेंव्हा ढेकर देऊन गादीवर पहुडण्याची तयारी करीत असतो तेंव्हा ही आदिवासी माय भगिनी काळ्या कुट्ट अंधारात काटे कुटे, झुडपे, तुडवत, दगड धोंड्यांना ठेचाळत डोक्यावर रिकामी घागर घेऊन पाण्याच्या शोधात भटकत असते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सुरगाण्यातील आदिवासी पाड्यावरचे हे भीषण वास्तव आहे. धरणांचा जिल्हा म्हणून शेखी मिरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यात जिथून पाणी पाझरते, ओढ्या नाल्यामधून प्रवाहित होऊन धरणात साठते, त्या आदिवासी भागालाच पाण्याची तीव्र टंचाई भासते हे वास्तव नेहमीचेच या पाणी टंचाईने कोरडा पडलेल्या घशातून धरण उशाशी कोरड घशाशी या शब्दांचे उच्चारण करण्याचे त्राणही या माता भगिनींमधे उरले नाहीत. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यावर असलेली भीषण पाणी टंचाई पाहून हृदय पिलवटून जाते. डोक्यावर, कमरेवर हंडी, कळशी हातात बॅटरी घेऊन, पाण्याच्या शोधात निघालेली आदिवासी पाड्यावरची वृद्ध महिला हे चित्र पाहून जिल्हा व्यवस्थेला कुठलीच दया येत नाही. हे पाहून मन अस्वस्थ होते. आहे सुरगाणा तालुक्यातील मोरडा अवघ्या 600 लोकवस्तीचा पाडा मात्र पिण्यासाठी पाणीच नसल्यानं महिलांना हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र भटकावं लागतं. दिवसभर काबाडकष्ट करायचं आणि नंतर पाण्याचा शोध घ्यायचा एवढाच दिनक्रम . गावातील विहिरीने तळ गाठलाय. तासनतास वेळ घालवल्यानंतर एखादं दुसरा हंडा भरतो, म्हणूनच डोंगर दऱ्याची काट्याकुट्याची वाट तुडवीत या महिलांचा अनवाणी प्रवास सुरु होतो. त्यातच हिंस्र पशूंची भीती दूर करण्यासाठी गावातील तरुण कोणी टेंभे घेऊन तर कोणी मोबाईल फ्लॅशचा उपयोग करून महिलांची पाठराखण करतांना दिसतात. या भटकंतीत एखादा झरा सापडला तर विश्व प्रदक्षिणा पूर्ण केल्याचे समाधान या माय माऊलीच्या चेहऱ्यावर झळकताना दिसते. मग महिलांची रांग लागते.वर्षोनुवर्षे हीच दुरावस्था ललाटी लेवून ही पायपीट सुरु आहे. केवळ माणूसच नाही तर मुकी जनावरेही या पाणी टंचाईला बळी पडत आहेत. लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीत येताय आश्वासन देऊन निघून जातात पाणी टंचाई तशीच पुढील पाच वर्षाची प्रतीक्षा तशीच रहाते. लग्न करून गावात सून म्हणून आलेल्या नवं विवाहितेला चुडा उतरण्याच्या आधी डोक्यावर हंडा घेऊन अनवाणी दाही दिशा भटकंती करीत पाण्याचा झरा शोधण्याची वेळ येते. हा केवळ मोरडा या एकाच गावाचा प्रश्न नाही तर आजूबाजूच्या गळवड, शिरीषपाडा, दांडीची बारी, म्हैसमाळ, देवळा, धुरापाडा, खुंटविहीर, मोहपाडा आशा अनेक गावची समस्या आहे गावातील लेकींना लहानपणापासूनच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, सुनांना लग्न झाल्यापासून पाण्याच्या खेपा मारायला जुंपावे लागते, म्हणूनच पेयजल योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा अशी मागणी होत असली तरी सरकारला अजूनही पाझर फुटत नाही हेच लोकशाहीचे काळे कुट्ट वास्तव आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

21 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

21 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

21 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

21 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

21 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

21 hours ago