नाशिक

कारवाई थंडावली; मुजोरी वाढली!

रिक्षाचालकांचे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न

नाशिक : प्रतिनिधी
ऑपरेशन क्लीनअप मोहिमेत गुन्हेगारांना कायद्याचा बालेकिल्ला दाखविल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी मोहीम सुरू केली. परंतु, नव्याचे नऊ दिवसच या मोहिमेचे अस्तित्व राहिले. रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा वाढली असून, फ्रन्ट सीट वाहतुकीबरोबरच भररस्त्यात रिक्षा लावणे, रहदारीला अडथळा निर्माण करणे हे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला मोहीम पुन्हा तातडीने सुरू करण्याची गरज आहे.
शहरातील रिक्षाचालकांमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असल्याचे चित्र आहे. त्यातही रिक्षाचालकांना पाठीशी घालणार्‍या ‘श्रमिक’च्या काही जणांवर कारवाई झाल्याने रिक्षाचालकही शिस्तीचे पालन करीत होते. स्क्रॅप रिक्षा जमा करण्याबरोबरच शेकडो रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे रिक्षाचालकांनी शिस्तीचे पालन करण्यास सुरुवात केली होती. अनेक रिक्षाचालक कारवाईच्या भीतीपोटी काही दिवस अंडरग्राउंड झाले होते. तर ड्रेसकोडचेही पालन केले जात होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम काहीशी थंडावली आहे. त्यामुळे रविवार कारंजावर भररस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवून ध्वनिप्रदूषणात भर टाकली जात आहे. फ्रन्ट सीटवर बसणार्‍यांनाही यापूर्वी पोलिसांनी प्रसाद दिला होता. परंतु, पोलिसांची कारवाई थंडावताच फ्रन्ट सीट वाहतूक सुसाट सुरू झाली आहे. शालिमार चौकात भररस्त्यात रिक्षा उभ्या राहत असल्याने पादचारी तसेच इतर वाहनधारकांना मार्ग काढणे अवघड झाले आहे.

गंगापूररोडवर फ्रन्ट सीट वाहतूक सुसाट

बारदान फाटामार्गे येणार्‍या रिक्षांमध्ये फ्रन्ट सीट वाहतूक अगदी सुसाट सुरू आहे. वाहतूक नियमांना धाब्यावर बसवत रिक्षाचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक करीत आहेत. फ्रन्ट सीटवर बसवून सर्वांचाच जीव धोक्यात घालणार्‍या रिक्षा गंगापूररोडवर सर्रासपणे धावताना दिसतात. शिवाजीनगर ते रविवार कारंजा या मार्गावर या रिक्षा धावत असतात.

बसेसना अडथळा

शहर वाहतुकीच्या थांब्यावर बस थांबल्यावर प्रवाशांना आडकाठी निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभ्या करतात. त्यातही रविवार कारंजा येथे तर भररस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने अशोकस्तंभाकडून रेडक्रॉसकडे जाणार्‍या वाहनधारकाला वाहन वळविणेदेखील अवघड होत आहे. येथे भाजीविक्रेत्यांचे आधीच अतिक्रमण आहे, त्यात यशवंत मंडई पाडल्याने वाहने या जागेवर पार्क केली जात असल्याने वाहतुकीची समस्या आणखी बिकट बनली आहे.

 

Editorial Team

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

15 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

15 hours ago