वडगाव पिंगळा, विंचूर दळवी परिसरातील 380 शेतकरी बाधित
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यात रविवारी (दि. 29) दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने वडगाव पिंगळा, विंचूर दळवी तसेच मानोरी परिसरातील पिकांना मोठा फटका बसला. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, कांदा, स्वीट कॉर्न, भाजीपाला आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे 210 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, 380 शेतकर्यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. दरम्यान, सोमवारी (दि.30) दुपारी सिन्नर शहरासह पूर्व भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रविवारी दुपारी सुमारे दोन वाजेपासून या भागात अचानक वादळी पाऊस व गारपीट सुरू झाली. जवळपास दीड तास मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साचले. त्यामुळे उभ्या पिकांसोबतच काढणी करून तळ्यावर साठवून ठेवलेल्या पिकांचेही नुकसान झाले.
वडगाव पिंगळा आणि विंचूर दळवी परिसर हा सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भाजीपाला उत्पादनासाठी ओळखला जातो. येथे शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच स्वीट कॉर्न, विविध प्रकारचा भाजीपाला तसेच फळ पिकांची लागवड करतात. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे या सर्व पिकांना मोठा फटका बसला. वादळी वार्यामुळे काही ठिकाणी पॉलिहाऊस व शेडनेटचेही नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी सकाळी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी बाधित भागात पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला. या अहवालानुसार वडगाव पिंगळा, विंचूर दळवी आणि मानोरी परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गावनिहाय नुकसान
वडगाव पिंगळा : कांदा 90 हेक्टर (200 शेतकरी) गहू 25 हेक्टर (60 शेतकरी) स्वीट कॉर्न / मका 15 हेक्टर (15 शेतकरी)
भाजीपाला 55 हेक्टर (50 शेतकरी)
विंचूर दळवी : कांदा 10 हेक्टर (25 शेतकरी) गहू 6 हेक्टर (10 शेतकरी) स्वीट कॉर्न / मका 4 हेक्टर (7 शेतकरी) भाजीपाला 4 हेक्टर (11 शेतकरी)
मानोरी : गहू 0.70 गुंठे (1 शेतकरी)
सोमवारी पूर्व भागातही अवकाळीची हजेरी
दरम्यान, सोमवारी (दि.30) दुपारी तीन वाजता सिन्नर शहरात तर चार वाजेनंतर सिन्नरच्या पूर्व भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुसळगावपासून पांगरीपर्यंतच्या पट्ट्यात पावसाचा प्रभाव जाणवला, तर पांगरी ते दातली दरम्यान पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे या भागातील गहू व कांदा पिकांचेही नुकसान झाल्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसामुळे आधीच काढणीच्या टप्प्यात असलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
Crops on 210 hectares damaged due to unseasonal rains
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…