नाशिक

अवकाळी पावसामुळे 210 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

वडगाव पिंगळा, विंचूर दळवी परिसरातील 380 शेतकरी बाधित

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यात रविवारी (दि. 29) दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने वडगाव पिंगळा, विंचूर दळवी तसेच मानोरी परिसरातील पिकांना मोठा फटका बसला. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, कांदा, स्वीट कॉर्न, भाजीपाला आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे 210 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, 380 शेतकर्‍यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. दरम्यान, सोमवारी (दि.30) दुपारी सिन्नर शहरासह पूर्व भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रविवारी दुपारी सुमारे दोन वाजेपासून या भागात अचानक वादळी पाऊस व गारपीट सुरू झाली. जवळपास दीड तास मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साचले. त्यामुळे उभ्या पिकांसोबतच काढणी करून तळ्यावर साठवून ठेवलेल्या पिकांचेही नुकसान झाले.
वडगाव पिंगळा आणि विंचूर दळवी परिसर हा सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भाजीपाला उत्पादनासाठी ओळखला जातो. येथे शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच स्वीट कॉर्न, विविध प्रकारचा भाजीपाला तसेच फळ पिकांची लागवड करतात. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे या सर्व पिकांना मोठा फटका बसला. वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी पॉलिहाऊस व शेडनेटचेही नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी सकाळी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी बाधित भागात पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला. या अहवालानुसार वडगाव पिंगळा, विंचूर दळवी आणि मानोरी परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गावनिहाय नुकसान

वडगाव पिंगळा : कांदा 90 हेक्टर (200 शेतकरी) गहू 25 हेक्टर (60 शेतकरी) स्वीट कॉर्न / मका 15 हेक्टर (15 शेतकरी)
भाजीपाला 55 हेक्टर (50 शेतकरी)
विंचूर दळवी : कांदा 10 हेक्टर (25 शेतकरी) गहू 6 हेक्टर (10 शेतकरी) स्वीट कॉर्न / मका 4 हेक्टर (7 शेतकरी) भाजीपाला 4 हेक्टर (11 शेतकरी)
मानोरी : गहू 0.70 गुंठे (1 शेतकरी)

सोमवारी पूर्व भागातही अवकाळीची हजेरी

दरम्यान, सोमवारी (दि.30) दुपारी तीन वाजता सिन्नर शहरात तर चार वाजेनंतर सिन्नरच्या पूर्व भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुसळगावपासून पांगरीपर्यंतच्या पट्ट्यात पावसाचा प्रभाव जाणवला, तर पांगरी ते दातली दरम्यान पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे या भागातील गहू व कांदा पिकांचेही नुकसान झाल्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसामुळे आधीच काढणीच्या टप्प्यात असलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

Crops on 210 hectares damaged due to unseasonal rains

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

19 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

19 hours ago