नाशिक

वारीच्या इतिहासात प्रथमच जिल्हा प्रशासनाचा निरोप सोहळा

सिन्नर : प्रतिनिधी
आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीने रविवारी (दि. 5) सायंकाळी नाशिक जिल्ह्याची सीमा ओलांडून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश केला. घोटेवाडी-निर्‍हाळे हद्दीतील आशापीर देवस्थान परिसरात नाशिक जिल्हा प्रशासनाने पालखीला भावपूर्ण निरोप दिला. अहिल्यानगर प्रशासनाने
उत्स्फूर्त स्वागत केले. विशेष म्हणजे, वारीच्या इतिहासात प्रथमच नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने असा औपचारिक निरोप सोहळा पार पडला.
दातली येथील गोल रिंगण सोहळ्यानंतर खंबाळे येथे मुक्काम करून पालखीने रविवारी सकाळी भोकणीमार्गे प्रस्थान केले. सुरेगावनंतर मर्‍हळ येथे ग्रामस्थांनी वारकर्‍यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. त्यानंतर निर्‍हाळे येथेही वारकर्‍यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मार्गातील गावांमध्ये वारकर्‍यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
निर्‍हाळे येथील श्री बुवाजी बाबा देवस्थानचे दर्शन घेत पालखी आशापीर गडाच्या दिशेने रवाना झाली. जिल्हा सरहद्दीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संगमनेरचे आमदार अमोल खताळ तसेच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन ममक्का यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी वरुणराजानेही हजेरी लावत पालखी सोहळ्याला अभिवादन केले.
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, त्यांच्या पत्नी अश्विनी पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतिलाल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, दीपक पाटील, गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, उपअभियंता अविनाश सहाणे, उपअभियंता अंकित जाधव तसेच वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी प्रशासनाच्या वतीने पालखीला निरोप दिला. चार जेसीबीमधून पालखीवर
फुलांचा वर्षाव करण्यात आला.

महिला अधिकार्‍यांना फुगडीचा मोह

जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या पत्नी अश्विनी पवार, तसेच उपस्थित महिला अधिकार्‍यांनी फुगड्या खेळून पालखी सोहळ्याचा आनंद लुटला.

प्रशासन 24 तास सेवेत

पालखीच्या नाशिक जिल्ह्यातील प्रवासादरम्यान जिल्हा परिषद आरोग्य विभाग, आशा कार्यकर्त्या आणि पोलीस यंत्रणा 24 तास सेवेत कार्यरत होती. जिल्ह्याची सीमा ओलांडताना पालखी प्रमुख, देवस्थानचे विश्वस्त आणि वारकर्‍यांनी आरोग्य व पोलीस विभागातील कर्मचार्‍यांचे विशेष आभार मानले. यावेळी नाशिक पोलिसांनी पालखी सोहळ्याची सुरक्षाव्यवस्था अहिल्यानगर पोलिसांकडे औपचारिकरीत्या सुपूर्द केली.

 

For the first time in the history of the Wari, a farewell ceremony organized by the district administration.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

21 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

21 hours ago