नाशिक

राज्यात जोरदार पावसाने दाणादाण

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही सरी; शेतीचे प्रचंड नुकसान

मुंबई :
राज्यातील अनेक जिल्ह्यांत गुरुवारी विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने दमदार आगमन केले. तीव्र उन्हाळ्याने नागरिक त्रस्त झाले असतानाच त्यांना पावसाच्या हलक्या सरींनी गारवा अनुभवायला मिळाला. मात्र, अवकाळी आलेल्या या पावसाने शेतकर्‍यांच्या फळबागांचे नुकसान झाले. शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून आले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतही झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. फळभाज्या, पालेभाज्यांसह कलिंगडाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
भंडार्‍यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी झाली. उन्हाळी भात पिकाला याचा फायदा होणार असला तरी, कापणीला आलेले पीक आणि पालेभाज्यांना याचा काही प्रमाणात फटका बसणार आहे. मराठवाड्यात मागील दोन दिवसांत झालेल्या गारपीट अवकाळी पावसामुळे 122 गावांतील 5 हजार 409 शेतकर्‍यांना फटका बसला असून, 3 हजार 261 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक 2 हजार 665 हेक्टरवरील नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. बीडमध्येही अवकाळी आणि गारपिटीचा फळबागांना फटका, फळगळतीने बागांचे नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातदेखील अवकाळीचा पुन्हा तडाखा बसला, वादळवार्‍याने आणि गारपिटीने आंब्याला मोठा फटका बसला असून बळीराजाचं नुकसान झालंय. लातूरमध्ये अवकाळी पावसाने टोमॅटो उत्पादकांचे कंबरडे मोडले असून खराब झालेले टमाटे उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला, ज्यामध्ये हजारो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. वाशिम जिल्ह्यातही वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याचे नुकसान झाले. नागपूर जिल्ह्याला मध्यरात्री अवकाळी पावसाने चांगले झोडपले, सतत दोन तास झालेल्या या पावसाने विशेष करुन पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आणि साक्री तालुक्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. तर, नागपूरातील कळमना एपीएमसी मार्केटमध्ये अवकाळी पावसात शेकडो पोती धान्य भिजलं. धाराशिवमध्ये पुन्हा वादळी वार्‍यासह अवकाळीचा तडाखा बसला. टॉमेटो शेती जमीनदोस्त झाली असून शेतकर्‍यांच मोठ आर्थिक नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील बहुला शिवारातील शेतकर्‍यांच्या टोमॅटो पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.

धुळ्यात पावसाचा धुमाकूळ
साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गारपिटीमुळे रबी पिकांचे कंबरडे मोडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे. निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी धुळे जिल्ह्याच्या साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस झाला असून पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
1 लाख 22 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नुकसान
राज्यात वादळी वारा व गारांच्या पावसामुळे 1 लाख 22 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकार्‍यांकडून घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करुन बाधित शेतक-यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पुण्यात दिवसा अंधार

पुण्यात गुरुवारी आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. पावसामुळे शहरात उजेडावर परिणाम झाला. वाहनचालकांना वाहनांचे दिवे भरदिवसा लावावे लागले. शहरातील जंगली महाराज रोड रस्त्यावर एक-दीड फूट पाणी साचले होते. स्वारगेट, वारजे या भागात पाणी साचायला सुरुवात झाली होती. पुणेकर पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी थांबले होते. वादळी वारे वाहिले. यामुळे काही ठिकाणी झाडे पडली असल्याचे पाहायला मिळाले.

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

‘पॅड’साठीही लढा

सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…

20 hours ago

नेपाळचे बदलते राजकारण

नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…

20 hours ago

‘नारी’शक्तीच्या आडून मिशन निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…

20 hours ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

20 hours ago

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…

20 hours ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

20 hours ago