आस्वाद

पावसाचीही टंचाई

– राजेश शिरभाते
भारतात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आधीच इंधनाच्या तुटवड्याने, सोने खरेदी न करता येण्यामुळे आणि परदेशी न जाण्याच्या आवाहनांच्या पार्श्वभूमीवर हा पावसाचा अंदाज देशातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणारा आहे. कमी पाऊस म्हणजे अन्नधान्यांची टंचाई आणि त्याचा परिणाम महागाई अशा साध्या सूत्रात दडलेला आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती स्वयंपाकाचा गॅस या सार्‍या गोष्टी महाग झाल्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते मोबाइल रिचार्जपर्यंत सर्वत्र महागाई वाढत असताना हा अंदाज मनात धडकी भरवणारा आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे गंभीर संकट उभे ठाकल्याचे पंतप्रधानांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर तेलंगणातील एका कार्यक्रमात सांगितले. त्यात त्यांनी अगदी खाद्यतेलापासून ते सोन्यापर्यंत सर्वच गोष्टींचा वापर कमी करायला सांगितले. परदेश प्रवास न करण्याचे आवाहन त्यांनी केले आणि ते स्वतः परदेश प्रवासाला निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ संरक्षणमंत्री कोरियात आणि नुकतेच वाणिज्य मंत्री कॅनडाच्या दौर्‍यावर जाऊन आले. मध्येही काही मंत्र्यांचे परदेश दौरे झाले. त्यामुळे लोकांच्याही मनात संभ्रम निर्माण झाला आहे. देशाची अर्थव्यवस्थेची चिंता करायची की बिर्ला यांच्या माफ झालेल्या कर्जाची चिंता करायची. आपण परदेशात स्वतःच्या पैशांनी जायचे नाही आणि आपल्या कराच्या पैशांवर मंत्र्यांचे दौरे पाहात बसायचे. एका दिवसाची सायकल व बस सफारी पाहायची की, सगळीकडे सुरू असलेल्या विकासकामांवर व त्यांच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमांवर झालेला खर्च पाहायचा. त्यात देशाच्या तरुण पिढीचे एक बरे आहे की ते आपल्या मोबाइलमध्ये डोके खुपसून धर्माचे कार्य करत आहेत. मात्र, त्यांचा खर्च उचलणार्‍या मागच्या पिढीला या सार्‍या गोष्टींची चिंता पडली आहे. एका बाजूला आर्थिक चिंता तर दुसरीकडे जगातील तिसर्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था होत असल्याचा आनंद, त्यातही रस्त्यांच्या कामाला इतका पैसा खर्च करूनही साधारण थायलंडसारख्या देशासारखे चांगले रस्तेही नाहीत. या सार्‍यांचा दोष मात्र रस्त्यावर कागदाचा कपटा टाकलेल्यांवर आणि वेगाने वाहन चालवणार्‍यांच्या अंगावर टाकला की आपण मोकळे. एका बाजूला रेल्वेतून लाखो लोक घाणेरड्या टॉयलटच्या बाजूने प्रवास करत आहेत तर दुसरीकडे रिकाम्या वंदे मातरम्चे प्रायोजित रील पाहावे लागत आहेत. एका बाजूला देशाची तरुण पिढी समर्थ आणि देशाची शक्ती असल्याच्या वल्गना आणि दुसरीकडे त्यांची एक साधी नीट परीक्षाही घेता न येणे, त्याच्यावर उपाय काय तर नीटच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका लष्कराच्या विमानाने पाठवणार. मग प्रत्येक राज्य सरकारांकडे जी विमाने आहेत, ती काय मंत्र्यांच्या दौर्‍यांसाठी आहेत का, असाही प्रश्न. एका बाजूला देशाच्या लोकशाहीची जगभरात प्रतिष्ठा तर दुसरीकडे कोणीही विरोधात बोलले की त्याच्यावर धाडी. अशा सार्‍या परिस्थितीत सध्या भारतीय अडकले आहेत. त्यातून त्यांची सुटका कधी होईल आणि ती सहीसलामत व्हावी, अशीच अपेक्षा आहे.
या सार्‍या मानसिक स्थितीचा परिणाम लोकांच्या आणि पर्यायाने समाजाच्या मानसिक स्वास्थ्यावर होत असतो. त्यातूनच नुकतीच पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली विषारी दारूसारखी घटनाही पुढे येते. या घटनेत आतापर्यंत 18 जणांचे बळी गेले आहेत. त्याची चौकशी करून दोषींना सोडले जाणार नाही, ही मुख्यमंत्र्यांची यशस्वी घोषणाही आलेली आहे. त्यामुळे आता या सर्वांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्यावर कारवाई होईल. केवळ त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करायला नको. नाहीतर तेही काही दिवसांनी जामिनावर बाहेर येतील आणि पुणे पोर्शे कार प्रकरणातील आरोपीप्रमाणे नाचून धिंगाणा घालतील. अशा पद्धतीचे लोक नंतर समाजातही मोठ्या मानाने मिरवतात. हा जो पुण्यातला अग्रवाल नावाचा माणूस आहे, हा कोण आहे, त्याने या सार्‍या प्रकरणात काय केले हे तर सर्वांना माहीत आहेतच. त्याचबरोबर ज्या घरात अशा प्रकारचे संस्कार असतात त्या घरातील पोराने दोघांना चिरडले यात काही गैर वाटत नाही. हा जर माणूस म्हणून जन्माला आला असता तर त्याची प्रतिक्रिया वेगळी असती. आता लवकरच त्याच्या समाजातर्फे त्याचा सत्कारही आयोजित केला जाईल. त्यानंतर त्याला पक्षात स्थान दिले जाईल. या सार्‍यामध्ये त्या कोणत्या तरी अधिकार्‍याने केवळ निबंध लिहून घेण्यासाठी किती पैसे घेतले असतील याची कल्पनाच केलेली बरी. या अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि रक्ताच्या लोकांना जनाची किंवा मनाचीही लाज नसते. ती झाकण्याकरिता त्यांनी हजारो लोकांची फसवणूक करून त्यातून पैसे मिळवलेले असतात. त्यातून ही अशी विचारसरणी तयार होते. समाजालाही पैसे असणारे आणि प्रतिष्ठा असलेली याच्यात फरक करता येत नाही. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींचेही पैसे मोजले जातात. त्यांची कामे किंवा स्वभाव पाहिले जात नाहीत. सातत्याने खोट्यावर विश्वास ठेवल्याने आणि वास्तवाचे भान न ठेवलेल्या समाजाचे फार लवकर पतन होते. अशा समाजाला गिळण्यासाठी प्रगत आणि वैचारिक समाज नेहमी सज्ज असतो. सध्या भारताची ही अशी स्थिती झालेली आहे. त्यामुळे एकेकाळी आपल्याशी वचकून आणि आपल्या बुद्धिमत्तेचा आदर करणारी अमेरिकाही आता आपल्याला डोळे दाखवायला लागलेआहे. त्यांच्या मनाने ते आपली परराष्ट्र धोरणे ठरवत आहेत. एका बाजूला आपल्याला इराण स्वस्तात तेल देऊ शकतो. होर्मुझमधून आपली जहाजेही पार करु शकतो. मात्र अमेरिकेने त्यांच्याशी दावा साधला आहे म्हणून आपल्या देशातील जनताही त्यात पिचली जात आहे. सध्या कोणालाही स्वयंपाकाचा गॅस मिळत नाही. एक एक महिना वाट पाहावी लागत आहे. आतापर्यंत जगाच्या अनेक भागात युद्धे झालेली आहेत. प्रत्यक्ष इराण आणि इराकमध्ये युद्ध झाले. आखाती देशांमध्ये युद्ध झाले मात्र या सार्‍यांचा परिणाम कधी आपल्या देशातील लोकांवर झाला नव्हता. तो आता झाला आहे. लोकांना वाटले होते की या परिस्थितीमध्ये चांगले पिकपाणी होईल. मात्र म्हणतात ना पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर त्याची तक्रार कोणाकडे करायची अशी सध्याची भारतीयांची स्थिती झाली आहे.
अशा स्थितीमधून बाहेर पडण्याचे ज्ञान भारतीयांकडे आहे. केवळ लोकांच्या कराच्या पैशावर मजा मारणार्‍यांबरोबरच या देशाच्या विकासात स्वतःहून हातभार लावणार्‍यांचीही या देशाला कधी कमतरता भासली नाही. या देशात अनेक संशोधक, विचारवंत, आजही आहेत. अनेक अर्थतज्ञ आहेत. परदेशातही आपल्या बुद्धीमत्तेची पताका फडकवणारे आहेत. ते या स्थितीतून नक्कीच मार्ग काढतील. या देशातील जनता सोशिक जरी असलपी तरी तिला वास्तवाचे ज्ञान आहे. पंडित जवाहरलाल नेहरु सारख्या नेत्याने या देशाचा पाया घातलेला आहे. त्यांचे नाव कितीही टाळले तरी त्यांचे विचार जाणार नाहीत. त्यामुळे स्थिती कितीही प्रतिकुल असली तरी भारतीय याही स्थितीतून नक्कीच मार्ग काढतील.

Lack of rain too

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

9 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago