संपादकीय

श्रीराम नवमीनिमित्त श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली नाशिकनगरी

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि नाशिकनगरी यांचे नाते अतूट आहे. रामायण काळ – पौराणिक काळापासून नाशिकनगरी श्रीरामाची पूजा करीत आहे. श्रीराम जन्मोत्सव हा तर नाशिकचा एक आगळावेगळा उत्सव मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम नवमीला श्रीराम जन्मोत्सव अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीत भगवान श्रीरामाची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांत श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. विशेषतः श्री काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी ‘सियावर प्रभू रामचंद्र की जय,’ ‘जय जय सिया राम’ या घोषणांनी मंदिर परिसर निनादला होता. यावेळी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शहरातील विविध उपनगरांत श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरांत आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अन्नकोट, महानैवेद्य, महाआरती आदी कार्यक्रम झाले.
वासंतिक नवरात्र महोत्सवात
रंगली श्रीराम गीतांची मैफल
‘श्रीराम कृपालू भजमन’, ‘स्वये श्री राम प्रभू ऐकती’, ‘राम का गुणगान करिये’, ‘राम जन्मला गं सखे’, ‘ठुमक चलत रामचंद्र’, ‘रामचंद्र सिया से’ या व अशा सुमधुर गीतांच्या सादरीकरणाचा ‘नवे सूर.. नव्या आशा’ हा कार्यक्रम रसिकांना भावला. श्री काळाराम संस्थानतर्फे आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ‘गणराज रंगी नाचतो’ या राधिका पवार यांनी गायलेल्या गीताने झाली. त्यानंतर ‘विठूमाउली तू’, ‘दुधात नाही पाणी’, ‘चल गं सखे पंढरीला’, ‘जिवा शिवाची बैलजोडी’, ‘अंजनीच्या सुता’, ‘रामकुंडाच्या तीरावर महादेव’, ‘मेरे घर राम आए हैं’, ‘खंडेरायाच्या लग्नाला’, ‘माउली माउली रूप तुझे’ अशा विविध गीतांचे गायन या कार्यक्रमातून करण्यात आले. राघवेंद्र पुजारी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
शिखर स्वामिनीतर्फे कर्तृत्ववान
महिलांचा सन्मान
नाशिकरोड येथील शिखर स्वामिनी बहुद्देशीय महिला संस्थेने आपल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून साजरा केला. संस्थेतर्फे नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. वैद्यकीय, गृहोद्योग, शिक्षण, संस्कृती, कला, क्रीडा, समाजसेवा, आरोग्य, नृत्य, गायन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांना ’नारीशक्ती शिखर सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा, माजी शिक्षण मंडळ सभापती संगीता गायकवाड, अध्यक्षा मीना पाटील, सीमा ललवाणी आदींच्या हस्ते महिलांचा गौरव झाला. यावेळी हेमलता जगताप, गायत्री मस्तूद, दीप्ती कर्डेल, रूपाली कांकरिया, भारती शेट्टी, छाया अहिरराव, मेघा वाळुंज, सुमन कडभाने, रेखा काळे, सुजाता चव्हाण, पल्लवी जोशी, आशा मुठाळ आदींचा गौरव करण्यात आला.
रसिक सूरच्या माध्यमातून गाण्यांची
वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
नाशिकमध्ये ’रसिक सूर’च्या माध्यमातून श्रीरामाच्या गाण्यांचा अभूतपूर्व गजर करत जागतिक विक्रमाची नोंद दि. 22 मार्च रोजी करण्यात आली. वंडर बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन या संस्थेकडून भोंसला मिलिटरी स्कूलच्या कोदंडधारी रामाच्या साक्षीने एक हजार 111 नागरिकांच्या सहभागातून सलग 101 मीटर श्रीराम गाण्यांचा विक्रम करण्यात आला. रसिक सूरचा हा सलग चौथा जागतिक विक्रम ठरला आहे. एकूण 22 गाणी सादर करण्यात आली. या कार्यक्रमासाठी भोंसला मिलिटरी स्कूलच्या समितीने मैदान उपलब्ध करून दिले होते. अनघा धोडपकर आणि संयोजक हिमांशु धोडपकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात 42 भजनी मंडळांचा सहभाग होता. वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक अ‍ॅमी छेडा व अथर्व शुक्ल यांनी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सर्वांचा गौरव केला.
इस्कॉनमध्ये रंगला ब्रह्मोत्सव
इस्कॉन मंदिरातील ‘श्री श्री राधा मदन गोपाल’ यांच्या प्राणप्रतिष्ठेस पंधरा वर्षे नुकतीच पूर्ण झाली. या वर्धापन दिनानिमित्त मंदिरात मोठ्या उत्साहात ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करण्यात आला. यावेळी भगवान राधा कृष्ण यांच्या विग्रहांना दीड हजार किलोहून अधिक फुलांच्या पाकळ्यांनी अभिषेक करण्यात आला. या अभिषेकासाठी सुमारे दीड तासाचा अवधी लागला. या विशेष सोहळ्यात परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, इस्कॉन नाशिकचे वरिष्ठ प्रचारक श्रीमान शिक्षाष्टकम प्रभू आणि बारा पुजार्‍यांचा सहभाग होता. या अभिषेकासाठी नाशिकसह उज्जैन व बेंगळुरू येथून विविध प्रकारची फुले मागवण्यात आली होती. महोत्सवानिमित्त श्री श्री राधा मदन गोपाल यांच्या विग्रहांची विशेष सजावट करण्यात आली होती.
नाशिक कवी संस्थेतर्फे दिवसभर
कवितांचा जागर उपक्रम
नाशिक कवी संस्थेतर्फे जागतिक कविता दिनानिमित्त आयोजित काव्यजागर उपक्रमात नाशिकच्या चैताली कापसे यांच्या ‘बाबा माझं काळीज’ या कवितेची सर्वोत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली. त्यांना काव्य करंडक प्रदान करण्यात आला. या उपक्रमात सकाळी नऊपासून दर तासाला वीस कविता याप्रमाणे सायंकाळपर्यंत दिवसभर कवितांचा जागर झाला. दर सत्रासाठी अध्यक्ष, दोन परीक्षक व सूत्रसंचालक असे नियोजन होते. प्रत्येक तासाला निवडलेल्या दोन कवितांमधून अंतिम सोळा कवितांची निवड करण्यात आली. समारोप सत्रात या सोळा कवितांचे सादरीकरण झाले. प्रा. सुनील हिंगणे व प्रा. प्रतिभा औटी यांनी त्यांचे परीक्षण केले. त्यातून कापसे यांच्या कवितेची निवड करण्यात आली. उपक्रमात सहभागी सर्व कवींना प्रशस्तिपत्र देण्यात आले.
विवेक धारा संस्थेच्या वतीने
नास्तिकांचा मेळावा
विवेकधारा संस्थेतर्फे शहीद भगतसिंग स्मृतिदिनानिमित्त आयोजित कुसुमाग्रज स्मारक येथे नास्तिकांचा मेळावा झाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार लोकेश शेवडे यांनी ‘श्रद्धा आणि जागतिक राजकारण’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक निळू दामले यांची लोकेश शेवडे यांनी मुलाखत घेतली. त्यात दामले यांनी अस्तिकता-नास्तिकता, जागतिक स्तरावरील धर्मवाद, राजकारण, शक्तिशाली नेत्यांचा उदय आदी विषयांवर भाष्य केले. गेल्या दहा वर्षांत देव व धर्माची जागा राजकारणाने घेतली आहे. लोकांच्या जगण्याचे आधार देव नव्हे, तर राजकीय नेते होत आहेत.
सिंधी समाजातर्फे चेट्रीचंड
उत्साहात साजरा
सिंधी समाजातर्फे चेट्रीचंड व सिंधी नववर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. विविध कार्यक्रमांत सिंधी समाजबांधवांनी सहभागी होत जल्लोेष केला. ‘जय झुलेलाल’चा जयघोष करत शहर परिसरातून काढलेल्या रॅलीने लक्ष वेधले होते. चैत्र महिन्याच्या चंद्रदर्शन दिवशी सांस्कृतिक व धार्मिक पद्धतीने हा उत्सव साजरा झाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रचंड उत्साह दिसला. सिंधी समाजातील हे नववर्ष असल्याने या दिवसाला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यंदाही नाशिक सिंधी पंचायत समितीतर्फे चेट्रीचंडनिमित्त विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शुक्रवारी दुपारी 3 पासून तपोवन लिंक रोडवरील श्री झुलेलाल मंदिर, नाशिक सिंधी पंचायत सभागृह येथे बहिराणासाहिब पूजन सोहळा पार पडला. दुपारी साडेचारच्या सुमारास शालिमार भागातील बी. डी. भालेकर मैदानापासून वाहनांच्या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत दुचाकी, चारचाकी वाहने सहभागी झाली होती. सहभागांनी ‘जय झुलेलाल’चा जयघोष करत आनंद साजरा केला. ज्येष्ठ, युवक, महिला असे सर्व समाजबांधव सहकुटुंब सहभागी झाले होते.

Nashik city resounds with the chants of Shri Ram on the occasion of Shri Ram Navami

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

18 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

18 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

18 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

19 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

19 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

19 hours ago